मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास-2, उद्योग, कामगार, मृद व जलसंधारण या विभागांच्या 100 दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. बैठकीत संबंधित विभागांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्देश दिले.
नगर विकास विभाग
• शहरांमध्ये दर्जेदार नागरी सोयी-सुविधा उपलब्ध करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे निर्देश.
• शहरांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करताना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन बंधनकारक करणे आणि त्याच्या पुनर्वापरासाठी पारदर्शक धोरण निश्चित करणे.
• सर्व नगरपरिषदांमध्ये जीआयएस प्रणाली आधारित मालमत्ता कर निर्धारण सुधारित करणे. मोठ्या करवाढीपासून नागरिकांना बचाव करण्यासाठी दक्षता घेणे.
मृद व जलसंधारण विभाग
• पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाशी संबंधित सर्व कामांना गती देणे.
• जलयुक्त शिवार अभियान 3.0, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश.
• प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, आदर्शगाव योजना आणि माजी मालगुजरी तलावांच्या पुनरुज्जीवन व दुरुस्तीच्या कामांना गती देणे.
• पदभरती प्रक्रियेची तातडीने अंमलबजावणी करून प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे मनुष्यबळाच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.
कामगार विभाग
• केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवरील कामगारांचे व्यवसायानुसार वर्गीकरण करणे.
• राज्यातील दीड कोटी नोंदणीकृत व असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजना एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे.
• ईएसआय रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यावर भर.
उद्योग विभाग
• ईज ऑफ डुइंग बिझनेस प्रक्रियेत सुधारणा करून ती उद्योगपूरक बनवणे.
• मैत्री पोर्टल व उद्योग आयुक्तालय पोर्टलवर एआय चॅटबॉट सुविधा कार्यान्वित करणे.
• महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील (MIDC) जागांचे वाटप 100 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश.
• उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, जेम्स अँड ज्वेलरी, वस्त्रोद्योग व एमएसएमई धोरणांमध्ये कालानुरूप बदल करण्यासाठी आराखडा तयार करणे.
• नवउद्योजकांसाठी विशेष कार्यक्रम राबवून तरुणांना अप्रेंटीशिप मिळावी यासाठी प्रयत्न.
• प्रत्येक जिल्ह्यातील उद्योग सेवा केंद्रांची कार्यक्षमता वाढवणे.
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री संजय राठोड, मंत्री आशिष शेलार, मंत्री आकाश फुंडकर, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.