X: @NalavadeAnant
मुंबई: काही ना काही तरी वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे वादग्रस्त व्यक्तिमत्व व ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचले. हे दोघेही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात प्रवेश करतील असा काहीसा धक्कादायक व खळबळजनक गौप्यस्फोट राऊत यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
त्यांच्या या वक्तव्याने आता दोन्ही नेते कोणती भूमिका स्पष्ट करणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला कमळाबाईच्या पदराखाली जाण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, असा दावा राऊत यांनी केला.
जागा वाटपाबाबतीत ते म्हणाले, लोकसभेच्या जिंकलेल्या जागांबद्दल बोलायचे नाही, असे धोरण आमचे ठरले आहे. शिवसेना २३ जागा लढण्यावर ठाम असल्याच्या आपल्या वक्तव्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
खा. संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोलही केला. शिवसेना आमचीच म्हणणे ही या गद्दार शिंदे गटाची नौटंकी असून त्याची स्क्रिप्ट दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी लीहलेली आहे. हा सिनेमा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच पडणार या आपल्या भाकिताचा पुनरुच्चार करत राऊत म्हणाले, यानंतर त्यांना कमळामध्येच विलीन व्हावे लागेल, मग तो शिंदे गट असो की अजित पवार गट, दोघांकडेही भाजपच्या चरणी बसण्याशिवाय दुसरा पर्याय आता उरलेला नाही, असा मार्मिक टोलाही खा.राऊत यांनी लगावला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून राऊत यांनी आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसलाही चांगलेच फटकारले. जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, असे आमचे धोरण ठरले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही २३ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी आम्ही १८ जागा जिंकल्या. छत्रपती संभाजीनगर आणि शिरूरची जागा थोड्या मतांनी गेली. त्यामुळे २३ जागांवर आमचा दावा असल्याचा पुनरुच्चार ही त्यांनी यावेळी केला.
मात्र त्याचवेळी आघाडीत शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी.वेणुगोपाल यांच्याशी आमचा उत्तम संवाद असून जागावाटपाबाबत काँग्रेससोबत आमची दिल्लीतच चर्चा होणार आहे, असे सांगत खा. राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे. प्रकाश आंबेडकर यांची हुकूमशाही हटविण्याची जी भूमिका आहे, तिच भूमिका आघाडीचीही असून त्यामुळेच त्यांना आघाडीत सामावून घेण्याबाबत दिल्लीतील काँग्रेसचे नेतेही अनुकूल आहेत, असे सांगत खा. राऊत यांनी वंचितबाबत उठणाऱ्या वावड्यांनही पूर्णविराम दिला. अयोध्येत होऊ घातलेला राममंदिर उद्नाघाटचा सोहळा हा भाजपचा पक्षीय सोहळा असल्यानेच आम्हीही त्यांच्या आमंत्रणाची वाट बघत नाही, अशा खोचक शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला.