मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच महिन्यात आज दुसऱ्यांदा महाराष्ट्रात आले आहेत. गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी नाशिक येथे युवा महोत्सव आणि अटल सेतूचं लोकर्पण केलं होतं. त्यानंतर आज पंतप्रधान सोलापूर येथे आले आहेत. सोलापूर गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय अमृत योजनेंतर्गत इतर दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचेही पंतप्रधान भूमिपूजन करणार आहेत.
दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावरून निशाणा साधला आहे. महाराष्ट्रावर प्रेम आहे म्हणून पंतप्रधान वारंवार राज्यात येत नाही, दुसरं उत्तर प्रदेशावर त्यांचं जास्त प्रेम म्हणून ते वारंवार उत्तर प्रदेशात जात नाहीत, तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचा दौरा प्लान आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधित जागा असून दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र निर्णायक भूमिका बजावेल. येथील सरकार अपयशी आहे. त्यांना कोणी मतदान करणार नाही. त्यामुळे मोदींना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतंय. गेल्या १३ महिन्यात ८ ते १० मोदींनी महाराष्ट्राचा दौरा केला आहे. खरंच हिंमत असेल तर त्यांनी मणिपूरला जाऊन दाखवावं, अशा शब्दात राऊतांनी मोदींवर निशाणा साधला.