राष्ट्रीय

संयुक्त किसान मोर्चातर्फे मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन 

Twitter : @milindmane70

मुंबई

संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या स्थापना संमेलनाच्या निमित्ताने शेतीवर अवलंबून असणारे सर्व घटक  शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, शेतीत राबणाऱ्या महिला, आदिवासी, मच्छिमार, या सर्वांच्या प्रश्नांवर विस्तृत मांडणी करणारा, त्यासंबंधी प्रमुख मागण्या अधोरेखित करणारा आणि येत्या काळातील जोरदार राज्यव्यापी कृती कार्यक्रम देणारा एक जाहीरनामा घोषित केला जाणार आहे. त्या आधारे महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाला मोठी चालना देण्यात येणार आहे.  

मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3 ते 6 या काळात आयोजित या अधिवेशनासाठी राज्यभरातील शेतकरी उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संमेलनात  महाराष्ट्रातील 27 किसान संघटना एकत्र येत आहेत. या अधिवेशनात संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते उपस्थित रहाणार असून त्यात कॉ. राजाराम सिंग, डॉ. दर्शनपाल, कॉ. अतुल कुमार अंजान, कॉ. डॉ. अशोक ढवळे, श्रीमती मेधा पाटकर, श्रीमती प्रतिभा शिंदे, डॉ. सुनिलम व इतर मान्यवर  आहेत. 

या संमेलनाची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे

भाजपच्या केंद्र सरकारने शेतीचे कॉर्पोरेटीकरण करण्याच्या उद्देशाने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना कडाडून विरोध करण्यासाठी एकवटलेल्या देशभरातील ५०० पेक्षा अधिक किसान संघटनांनी २६-२७ ऑक्टोबर २०२० रोजी दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाची स्थापना केली. या मोर्चाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या तीन शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट धार्जिण्या कायद्यांना विरोध करण्यासाठी देशव्यापी संघर्षाची हाक दिली. देशभर गंभीर होत असलेले कृषी संकट पाहता, तीन शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करण्याबरोबरच संयुक्त किसान मोर्चाने देशभरातील शेतकरी-शेतमजुराचे संपूर्ण कर्ज केंद्र सरकारने माफ करावे व शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी स्वामिनाथन आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची हमी देणारा कायदा करावा अशी मागणी केली.

शेतीमालाच्या उत्पादन खर्चात कपात, शेतकरीविरोधी वीज विधेयक रद्द करणे, सर्वंकष पीक विमा योजना, शेतकरी-शेतमजूर पेन्शन, अशा शेतकरी हिताच्या इतर मागण्यावरही संयुक्त किसान मोर्चाने देशभर लढा उभारण्याचा निर्णय घेतला.

दिल्लीच्या सीमांवर २६ नोव्हेंबर २०२० ते ११ डिसेंबर २०२१ असा वर्षभर कडवा संघर्ष करत संयुक्त किसान मोर्चाने अभूतपूर्व विजय प्राप्त केला. केंद्र सरकारला तीन शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यायला भाग पाडले. शेतकरी आंदोलनातील ७०० हून अधिक शहिदांच्या परिवाराना सहाय्य, लखीमपूर खिरी हत्याकांडातील आरोपींना शिक्षा अशी अनेक आश्वासने तेव्हा सरकारने दिली होती. प्रत्यक्षात मात्र कृषी कायदे रद्द करण्याव्यतिरिक्त केंद्र सरकारने इतर आश्वासने पाळली नाहीत. परिणामी संयुक्त किसान मोर्चाला आपला संघर्ष सुरूच ठेवावा लागला.

कॉम्रेड अशोक ढवळे

या संघर्षाला बळ देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने राज्यस्तरावर संयुक्त किसान मोर्चाच्या शाखा स्थापन करण्याची हाक दिली. या निर्णयानुसार दिल्ली किसान आंदोलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या संघटनांच्या पुढाकारातून राज्य शाखा स्थापनेचे हे अधिवेशन घेण्यात येत आहे. यात महाराष्ट्रातील प्रमुख 11 किसान संघटनांसह विविध 27 संघटना सहभागी होत आहेत.

दिल्लीत वर्षभर झालेल्या किसान आंदोलनाने देशभरातल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला ताकद तर दिलीच, त्याचबरोबर या देशात लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवत कोणी जर हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करत असेल तर अहिंसेच्या व संविधानिक मार्गाने लढा देत त्यांना नमवता येते हेही दाखवून दिले.

मागील काही काळापासून शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न धुमसत आहेत. महाराष्ट्र राज्यापासून ते दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांनी सतत धडका मारूनही शेतकऱ्यांना संकटामधून बाहेर काढण्यासाठी शासन कुठलेही ठोस पाऊल उचलायला तयार नाही. उलट सातत्याने शेतकऱ्याचे कसे शोषण केले जाईल यासाठी बडे उद्योगपती व बडे व्यापारी यांच्या फायद्याची धोरणे हे सरकार आखत आहे. कांद्यावर घसघशीत निर्यात कर लावण्याचे ढळढळीत शेतकरीविरोधी पाऊल केंद्र सरकारने नुकतेच घेतले आहे, त्याचा मोठा फटका महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांच्या शेतकऱ्यांना बसला आहे. 

राज्यातील व देशातील सरकार शेतकरी व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यापैकी कोणालाही विश्वासात न घेता अध्यादेशाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार व येथील कष्टकरी सर्वसामान्यांच्या बाजूने असणाऱ्या कायद्यांमध्ये बदल करत देश खाजगी कंपन्या व उद्योगपतींच्या घशात घालायचे काम करीत आहे.

मेधा पाटकर

महाराष्ट्रातील भाजप प्रणित शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार (Shinde -Fadnavis- Ajit Pawar government) भाजपच्या केंद्र सरकारची री ओढत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दगा दिल्यामुळे भीषण दुष्काळाचे सावट महाराष्ट्रावर उभे ठाकले आहे. ते युद्ध पातळीवर हाताळण्या ऐवजी राज्य सरकारने परवा, कृषी अरिष्ट आणि बेरोजगारीमुळे होरपळणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनावर (ज्यात 90% कृषक आहेत) जालन्यात अत्यंत अमानुष लाठीहल्ला (lathi charge on Maratha protestors) आणि हवेत गोळीबार करून शेकडो स्त्री – पुरुषांना जबर जखमी केले, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच होईल.

केंद्रात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचे (complete waiver of farmers loan) आश्वासन देऊन नंतर त्याकडे पाठ फिरवली, मात्र त्याच काळात देशातील उद्योगपतींची १५ लाख कोटी रुपयांची कर्जे (write off loan of capitalists) माफ केली. ह्या सारख्या मुद्द्यांना गाव पातळीपासून ते राज्य व केंद्र पातळीपर्यंत टोक आणण्यासाठी हे महत्त्वपूर्ण अधिवेशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये  होत आहे. या अधिवेशनाला राज्यभरातून शेकडो शेतकरी, कष्टकरी, गरीब मजूर हजेरी लावणार असल्याने पुन्हा एकदा मुंबईत शेतकरी एल्गार ऐकण्यास राज्य सरकारला मिळणार आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे