पुणे : “ससून रुग्णालयाने दिलेला अहवाल आम्हाला मान्य नाही. तो अहवाल कचऱ्याच्या डब्यात टाका किंवा जाळून टाका,” अशा संतप्त शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ससून रुग्णालयावर घणाघाती टीका केली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील महिलांच्या मृत्यूप्रकरणी ससून रुग्णालयाने दिलेल्या अहवालावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, “हा अहवाल फक्त संबंधित रुग्णालय आणि डॉक्टरांना वाचवण्यासाठी तयार केला आहे. एखाद्या महिलेला आपला जीव गमवावा लागतो आणि त्यानंतर सरकार अजूनही कारवाई करत नाही, हे असंवेदनशील राज्याचे लक्षण आहे.”
“एक आई, एक मुलगी, एक बहीण गेली आहे. तरीही असा खोटा, दिशाभूल करणारा अहवाल तयार केला जातो याचं आश्चर्य वाटतं,” अशा तीव्र शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. सुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा अहवाल आम्ही मान्य करत नाही. जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सरकार माणुसकी विसरत असेल, पण आम्ही नाही.”
सुळे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांचे आभार मानले. “जगताप 24 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात या प्रकरणावर याचिका दाखल करणार आहेत. आम्हाला न्यायालयात का जावं लागतंय? कारण सरकारच आरोपींच्या पाठीशी उभं आहे. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
सुळे म्हणाल्या, “ही कोणत्याही पक्षाची लढाई नाही. ही माणुसकीच्या नात्याने सुरू असलेली लढाई आहे. भिसे कुटुंबाशी आमची भेट झाली आहे. सर्व कागदपत्रं आम्ही पाहिली आहेत. त्यामुळे आमचा मुद्दा स्पष्ट आहे – या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.”
अधिक स्पष्ट भूमिका घेत सुळे म्हणाल्या, “जर असा खोटा रिपोर्ट तयार केला गेला असेल, तर तो करणाऱ्यांनाही सहआरोपी ठरवले पाहिजे. हा देश संविधानाने चालतो आणि अखेर विजय सत्याचाच होतो.”
या प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याची खरमरीत टीका करत, खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, “महाराष्ट्रात एका लेकीची हत्या झाली, आणि सरकार तिच्या मारेकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.”