पुणे
‘निर्भय बनो’ सभेला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर काही भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. पुण्यात राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वागळे कार्यक्रमाला आले तेव्हा त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेकदेखील करण्यात आली.
या घटनेचा राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह ४३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वागळेंना पोलिसांनी सभा न घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, वागळे सभा घेण्यावर ठाम होते. हल्ला झाल्यानंतर निखील वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांनी राष्ट्रसेवा दलाच्या कार्यलयात सभा घेतली.
निखील वागळे यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट केली होती. यावरुन भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळे ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाला जात असताना निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
आज निखिल वागळे यांनी यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. काल मृत्यू दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे, जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य… कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी ऋणी आहे.
आजवर सहा हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलीसांच्या संगनमताने हा हल्ला झाला. काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले-आंबेडकर यांच्या आशीर्वादाने ही माझी श्रद्धा आहे.
आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो. तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू? जास्त बोलवत नाही. कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही. संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलीनच.