राजीनामा मागे घेण्याची माझी कुवत, शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर, विचारांशी बाधील आहोत, संधीसाधू नाहीस; पवार बरसले
पुणे
राजीनामा मागे घेण्याची माझी कुवत आहे, त्यासाठी कुणाच्या सल्ल्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं. अजित पवार म्हणाले त्यातील बऱ्याच गोष्टी मलाही पहिल्यांदाच समजल्या. त्यात स्फोट होता का, लवंगी होती का, याचा विचार करावा लागेल. माझ्याकडून अजित पवारांना कधीही बोलावलं नव्हतं. पक्षाचा अध्यक्ष असल्याने अनेक नेत्यांशी माझा सुसंवाद होता. भाजपासोबत जाण्याच्या पर्यायाची चर्चा झाली होती, ते मी नाकारत नाही. मात्र अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे सहकारी ज्या रस्त्यानं जाण्याचा विचार करत होते, तो विचार आम्हाला आणि आम्ही जनमानसात जे शब्द दिले त्याला सुसंगत नव्हता. अजित पवार यांच्या आरोपांच्या सत्यतेवरच त्यांनी प्रश्न उपस्थित केलंय.
पक्षाने निर्णय घेतल्यानंतरही पहाटेचा शपथविधी करणं, हा पक्षाच्या धोरणाचा भाग होता असं म्हणता येणार नाही, असंही पवार म्हणाले. राष्ट्रवादी कुणी स्थापन केली हे देशात आणि राज्यात सगळ्यांना माहीत आहे, असंही पवार म्हणाले.
भाजपासोबत जाणं मतदारांची फसवणूक
राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या निवडणुका लढवल्या होत्या, जी मतं मागितली होती, ती भाजपामध्ये जाण्यासाठी नव्हती. ती एका विशिष्ट कार्यक्रमासाठी नव्हती. आम्ही मागितलेली मतं ही भाजपा आणि एका विचारांच्या विरुद्ध होती. त्या विचारांना धरुन मतदारांनी आमच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं होतं. त्याच्या विपरीत भूमिका घेत भाजपासोबत जाणं ही मतदारांशी फसवणूक आहे, असं आपल्याला वाटलं. त्यामुळं भाजपासोबत जाण्याचा निर्णय करु नये, अशी भूमिका अनेक सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आपण घेतल्याचं पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घएतला, त्याबाबत तक्रार नाही. मात्र ज्यावेळी त्यांनी निवडणूक लढवली, त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर तिकिटावर निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी घेतलेली भूमिका लोकशाहीत विसंगत आहे, असं पवार म्हणाले.
शिवसेनेसोबत जाण्यासाठीही मतं मागितली नव्हती का?
भाजपा आणि शिवसेनेसोबत जाण्यात फरक आहे. शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका भाजपाविरोधात जाण्याचीच होती. आजही आमची भूमिका भाजपाविरोधी आहे, शिवसेनाविरोधी नाही. जे आज मविआ ससरकार स्थापन झालं म्हणून टीका करीत आहेत, तेच त्यावेळी मंत्रिपदाची शपथ घेऊन सत्तेत आले होते, असा टोलाही अजित पवार गटाला शरद पवारांनी लगावला आहे. सत्य नसेल तर ते स्वीकारायचं कसं असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केलाय,
राजीनामा मागे का घेतला?
चर्चा सुरु होत्या, पण कुणालातरी सांगून राजीनामा दिला अशी स्थिती नव्हती. पक्षाचे अध्यक्ष आपण होतो, त्यामुळे राजीनामा देण्याचं कारण काय होतं. सामूहिक निर्णय झाला होता, सामूहिक निर्णयाच्या विरोधी जाण्याचं काही कारण नव्हतं. भाजपासोबत जायचं नाही, अशी आपली स्पष्ट भूमिका होती, असं शरद पवार यांनी म्हटलय. जर राजीनामा दिला होता तर तो मागे घेण्यासाठी आनंद परांजपे किंवा जितेंद्र आव्हाड यांची परवानगी घेण्याची गरज नव्हती. या दोघांना बोलावून आंदोलन करा, असं सांगण्याची
बारामतीत आव्हानावर काय भूमिका?
लोकशाहीत कोणताही पक्ष कोणाहीसमोर उभा राहू शकतो. अन्य पक्षाचे नेते आणि विचारांना त्यांचे उमेदवार देण्याचा अधिकार आहे. याबाबत तक्रार करण्याचा अधिकार नाही. याबाबत जनतेसमोर जाऊन मतं मांडायची असतात, त्याचा निर्णय मतदार घेतील. बारामतीत पवार विरुद्ध पवार नव्हे तर झाला तर पवार विरुद्ध सुळे असा संघर्ष होईल, असंही पवार म्हणालेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ज्या उमेदवाराला तिकिट देतील, तो निवडणूक लढवेल, असंही ते म्हणालेत.
लोकांमध्ये अस्वस्थता आहे, दुष्काळ आणि अवकाळीमुळे झालेलं नुकसान आणि त्याकडे गंभीरपणे सरकार पाहत नसल्यानं अस्वस्थता असल्यातचं पवार म्हणालेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेत.
प्रफुल्ल पटेलांवरही टोलेबाजी
२००४ साली भाजपासोबत गेलं पाहिजे, असा आग्रह प्रफुल्ल पटेल यांनी घरी येऊन मांडला होता. तासनतास सातत्याने हे पटेल त्यावेळी सांगत होते. मात्र आपण जाणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर जा, असा सल्ला आपण त्यांना दिल्याचं पवार म्हणालेत. पटेल त्यानंतर पक्षातच राहिले. २००४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र तरीही त्यांना पक्षानं केंद्रात मंत्रीपदं दिलं, हेही ध्यानात घ्यायला हवं, असंही शरद पवार म्हणालेत. प्रफुल्ल पटेल यांच्या पुस्तकाची वाट पाहत आहे, असंही पवार म्हणाले. नेते पक्ष सोडून का जातात, यावर एक प्रकरण त्यांनी लिहावं असंही पवार म्हणाले. ईडीनं त्यांच्या घरातील किती मजले ताब्यात घेतलेत हेही त्यात लिहावं, असा टोलाही पवारांनी लागवलाय. अजित पवारांच्या टीकेचा किंचितही त्रास होत नाही, असंही पवार म्हणालेत.