पराभूत नेत्यांच्या हट्टामुळे पक्षाची गळती वाढणार?
महाड – कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीतही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला. परिणामी, सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंत अनेक माजी आमदार आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. आता उरलेसुरले शिवसैनिकही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत कोकणातील १५ पैकी केवळ गुहागरमधून भास्कर जाधव विजयी झाले, तर उर्वरित सर्व ठिकाणी शिवसेना (उद्धव गट) पराभूत झाली. एवढ्या मोठ्या पराभवानंतर पक्षाने आत्मपरीक्षण न करता, लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांच्या सल्ल्यावरून कार्यकर्त्यांमध्ये पदवाटप सुरू केल्याने निष्ठावान शिवसैनिक नाराज झाले आहेत.
कोकणातील निष्ठावंत शिवसैनिकांना विश्वासात न घेता पराभूत नेत्यांनी आपल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांना संधी दिल्याने पक्षात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक शिवसेना शिंदे गट, भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यामध्ये जाण्याच्या विचारात आहेत.
लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या नेत्यांची जनमानसातील प्रतिमा पूर्णतः मलीन झाली आहे. तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावरच संघटनेची जबाबदारी टाकल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या नेत्यांच्या वागणुकीमुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्त्व मिळत नसल्याने अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
शिवसेना भवनात बसून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांकडूनच कोकणातील नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली जात असल्याची चर्चा आहे. परिणामी, जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. त्यामुळे कोकणातील उरलेसुरले शिवसैनिक लवकरच भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) किंवा शिवसेना (शिंदे गट) मध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, कोकणात शिवसेनेला गळती लागण्याची दाट शक्यता असून, येत्या काळात पक्षाच्या संघटनात्मक स्थितीवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.