मुंबई – दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआय कडून सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी गुरुवारी शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केले. या प्रकरणात दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब असून दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळायलाच हवा, अशी मागणी आंदोलना दरम्यान करण्यात आली.
दिशा सालियन हिच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली असून, त्यांना न्याय मिळावा, असे आमचे म्हणणे आहे, असे शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाला कोणताही राजकीय रंग दिलेला नाही. मात्र, पाच वर्षे न्याय न मिळाल्याने सालियन कुटुंबाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला, असेही त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, “दिशाच्या वडिलांनी या प्रकरणाला हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. १४ व्या मजल्यावरून कोणी पडले, तर शरीरावर एकही मोठी जखम न दिसणे, डोक्यावर गंभीर मार न लागणे, हे शक्य कसे? हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा आहे.” अशा अनेक गंभीर शंका उपस्थित झाल्या असून, त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
सीबीआय चौकशीची मागणी
“आम्ही कोणावरही सरसकट आरोप करत नाही. मात्र, दिशाच्या वडिलांनी काही व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे. त्यामागे काही ठोस कारणे किंवा माहिती असणार. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत पुन्हा सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी आ. डॉ. कायंदे यांनी केली.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी आवश्यक
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे डॉ. कायंदे यांनी सांगितले. “सालियन कुटुंबाला कोणी दबावाखाली ठेवले का? खोटी माहिती देण्यात आली का? न्यायासाठी धडपडणाऱ्या दिशाच्या वडिलांना एखाद्या सत्ताधारी गटाने वेगळ्या दिशेने जाण्यास भाग पाडले का?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. “या सर्व प्रश्नांची उत्तरे किशोरी पेडणेकर यांनी द्यावीत,” अशी मागणीही त्यांनी केली.
पोलीस तपासावर गंभीर आरोप
याचिकेत दिशाच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “तपास पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर कोणाला तरी वाचवण्यासाठी आणि सत्य दडपण्यासाठी प्रयत्न झाले. योग्य पद्धतीने फॉरेन्सिक तपासही झाला नाही. पोस्टमार्टम अहवालही दिशाभूल करणारा आहे. वैद्यकीय पुरावे नष्ट करण्यात आले,” असे याचिकेत नमूद आहे.
“जर हे आरोप सत्य असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. पोलिसांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह आहे. अशा प्रकरणात मोठ्या स्तरावरील दबावाशिवाय असे घडणे शक्य नाही,” अशी दाट शंका डॉ. कायंदे यांनी व्यक्त केली.