X: @therajkaran
मुंबई: मुंबईतील तीन लोकसभा क्षेत्रात प्रवास सुपर वॉरीअर हे ५१% मत मिळविणारे पक्षाचे नेतृत्व आहे. हे सर्वच फाईटर आहेत. पक्षाचा कणा म्हणून आपण सुपर वॉरीअरकडे बघत आहोत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
देशात व राज्यात भाजपासह महायुतीला केवळ विजय नव्हे तर महाविजय साकारायचा असून त्यात हातभार लावावा. गुरुवारी मुंबईतील उत्तर मुंबई लोकसभा, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमुख म्हणजे, सुपर वॉरियर्ससोबत त्यांनी संवाद साधला. त्यांच्या या प्रवासात उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर, मुंबई उत्तर लोकसभा समन्वयक व चारकोपचे आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश चिटणीस राणी द्विवेदी, मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, मुंबई उत्तर जिल्हाध्यक्ष गणेश खणकर,सुहास अडिवरेवर व राजेश सिंग यांच्यासह लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
श्री बावनकुळे म्हणाले, सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा भाजपाचा दुपट्टा घालतो तेव्हा तो कार्यकर्ता होतो. सुपर वॉरियर्सच्या गळ्यात असलेला भाजपाचा हा दुपट्टा हीच त्यांची ओळख आहे. आपला सन्मान व या दुपट्ट्याची शान राखण्यासाठी पक्षकार्य करताना निवडणुकीत विजयासाठी प्रयत्न करावे. ज्यातील सर्व प्रमुख नेते त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील ६०० घरापर्यंत पोहचून मोदी सरकारच्या योजनांची माहिती देणार आहेत. मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या योजना अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी तेरा महिने दररोज तीन तास संपर्क करावा, असे आवाहन श्री बावनकुळे यांनी केले.
महायुतीचे ४५ प्लस खासदार विजयी होणार
मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या कामांवर विश्वास ठेवून जनता महाराष्ट्रात महायुतीचे ४५ प्लस खासदार, २२५ प्लस आमदार निवडून येतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. देशात ४००हून अधिक एनडीएचे खासदार निवडून येतील. ५१ टक्के मते आपल्याला मिळविण्यासाठी सतत जागे राहावे, असे आवाहन त्यांनी सुपर वॉरियर्ससह पदाधिकाऱ्यांना केले.
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सकाळी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील चारकोप, मागाठाणे, आणि मलाड (प.) विधानसभा मतदारसंघ विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दुपारी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सायन-कोळीवाडा, वडाळा आणि माहिम विधानसभा आणि सायंकाळी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील कुलाबा, मुंबादेवी आणि मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
जनतेच्या मनातील पंतप्रधान मोदीच
राज्यभर केलेल्या प्रवासाविषयी आपला अनुभव प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितला, ते म्हणाले, मी राज्यातील जवळपास ४४ हून अधिक लोकसभा क्षेत्राचा प्रवास केला, त्यात ४७ हजारहून अधिक लोकांशी संवाद साधला. बोटावर मोजता येतील एवढे लोक वगळता सर्वच लोकांनी मग तो गरीब असो की श्रीमंत सर्वांनी पंतप्रधानपदी पुन्हा एकदा मोदी यांनाच विराजमान होताना पहायचे आहे, असे सांगितले.
Also Read: जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य हा वारकरी, माळकर्यांचा अपमान : देवेंद्र फडणवीस