X: @therajkaran
मुंबई: विधानसभा अध्यक्ष आणि सभागृह नेते मुख्यमंत्री यांची भेट झाली म्हणजे आकाश कोसळले, असे मानण्याचे कारण काय? आपली बाजू लंगडी आहे असे वाटते त्यांनी मतप्रदर्शन करून खोटी सहानुभूती मिळवणे बंद करावे, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षप्रवक्ते दिपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसंदर्भात कडवट टिकास्त्र सोडले. त्याला सायंकाळी मंत्रालय वार्ताहर कक्षात घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन केसरकर यांनी उत्तर दिले. विधानसभा अध्यक्षांनी आरोपींना भेटणे चुकीचे, असे भाष्य माजी मुख्यमंत्री यांनी करणे चुकीचे आहे. या भेटीत कोणतीही लपवाछपवी नाही. ज्यांची बाजू लंगडी असते, त्यांनाच भिंती वाटते. आम्ही नेहमीच त्यांचा मान ठेवला आहे. स्वत:च्या पक्ष घटनेत परस्पर बदल करणाऱ्यांनी थोडा पेशन्स ठेवावा, अशी मल्लीनाथीही केसरकर यांनी केली.
ज्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे, त्यांच्यावर दुसरा व्हिप लागू होत नाही. ज्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे, त्यांना कोणत्याही पक्षात विलीन होण्याची गरज नाही. ठाकरे गटाचे अनेक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहेत, याकडे दीपक केसरकर यांनी लक्ष वेधले.