X : @NalvadeAnant
मुंबई
राम मंदिरासाठी ज्या कोठारी बंधूंनी स्वतःचे बलिदान दिले, त्यांचा खून मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने केला. रामभक्त, कारसेवक कोठारी बंधूंच्या खुनाच्या रक्ताने ज्या समाजवादी पक्षाचे हात रंगलेले असताना त्यांच्याशीच हात मिळवणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे त्यांच्याही हाताला रामभक्तांच्या, कारसेवकांच्या खुनाचे रक्त लागले आहे, असा थेट व खळबळजनक आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केला.
आ. शेलार यांनी पक्षाच्या बैठकीबाबतीत माहिती देताना सांगितले की, भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम चालू असून तीन लोकसभासाठी एक नेता याप्रमाणे देशभर प्रवासाचा कार्यक्रम ठरला आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सर्वजण देशातील तीन ते चार लोकसभेचे एक क्लस्टर बनवून बैठका घेणार आहेत. त्या अगोदर राज्य प्रदेशाध्यक्ष प्रत्येक लोकसभेच्या तीन विधानसभांच्या बैठका घेणार आहेत. त्याचा दौरा आता सुरू झाला आहे. जे विधानसभेतील प्रत्यक्ष निवडणुकीचे काम पाहणार आहेत. या सुपर वॉरिअरची मुंबईतील बैठक घेतली जाणार आहे. संघटनेच्या तळागाळातील स्तरावर पोहोचणे हे त्यामागील उद्दिष्ट आहे. याच अनुषंगाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी पत्रकारांनी शरद पवार गटाच्या बैठकीबाबत विचारले असता ते म्हणाले, शरद पवार यांनी पहिल्यांदा स्पष्ट करावे की, त्यांच्या पक्षात किती आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आहेत. हा पक्ष आहे का, तो गट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना तो गट आहे या सत्यावर आता यावंच लागेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे जागवापाची चर्चा करण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत, याकडे लक्ष वेधता आ. शेलार म्हणाले की, उध्दव ठाकरे आमच्याबरोबर असताना आमच्याकडे या, बंगल्यावर या, अशा पद्धतीचा अहंकार दाखवणारे आता सरपटत दिल्लीला चालले आहेत. त्यांना सरपटत दिल्लीला जाऊ दे, कुर्निसात घालून दे, महाराष्ट्र हे बघतो आहे. आज ठाकरेंचा शिवसेना गट स्वतःच्या जागा जिंकण्यासाठी मदत करण्याकरिता देशभर सरपटत आहे. आमच्याबरोबर ज्या वेळेला होते त्यावेळी ठाकरे कुटुंबाचा मान आणि स्वाभिमान हा भाजपाने टिकवला होता. पण स्वार्थासाठी आणि स्वतःच्या मुख्यमंत्री पदाकरिता, खुर्चीसाठी लोलुपता केवढी होते हे उद्धव ठाकरे यांनी आज दाखवले आहे अशीही टीका आ. शेलार यांनी केली.