मुंबई : महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत अनुदानाच्या मागण्यांवर बोलताना केला.
पटोले यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, “महायुती सरकारने बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, पण १०० दिवस उलटले तरी त्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. उलट, लाभार्थींची संख्या कमी करण्याचे काम सुरू आहे.”
पटोले यांनी राज्यातील बेरोजगारीबाबतही सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “दावोसहून लाखो कोटींची गुंतवणूक आल्याचा दावा सरकार करते, पण प्रत्यक्षात हे उद्योग गेले कुठे? किती रोजगार निर्माण झाले? सरकारने याबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी.”
वीज संकट आणि शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
“नवीन पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार पुरेशी वीज देत नाही. लोड वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळतात आणि कृषीपंप बंद पडतात. दुरुस्तीसाठी सहा-सात हजार रुपये आणि ४-५ दिवस लागतात. सौर ऊर्जेसाठी अर्ज करून पैसे भरले तरी पंप बसवले जात नाहीत. सरकारने यावर तोडगा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
पटोले यांनी राज्यातील महागड्या वीज दरांवरही सवाल उपस्थित केला. “देशातील सर्वात महागडी वीज महाराष्ट्रात आहे. वीज दर कमी करण्यासाठी सरकार काय करणार? यातील भ्रष्टाचार कसा रोखणार?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
त्याचबरोबर, राज्यातील वाढीव करांमुळे उद्योजक बाहेर जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
“राज्यातील कर मोठ्या प्रमाणात वाढवले गेले आहेत, त्यामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर चालले आहेत. उद्योग वाढीसाठी सरकारने कोणती पावले उचलली?” असे त्यांनी विचारले.
कामगार खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलत पटोले म्हणाले,
“कामगारांसाठी पेट्या वाटल्या जातात, पण त्या कोणाला मिळतात? यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. काही अधिकारी कामगारांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे पाप करत आहेत.”
गडचिरोली जिल्ह्यातील खाणकामामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. “खाणकामामुळे आदिवासींचे जीवनमान उध्वस्त होत आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? पाणंद रस्त्यांचे काम कधी पूर्ण होणार?” असे त्यांनी विचारले.