नाना पटोले यांचा भाजपवर थेट निशाणा….!
केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्याचा प्रयत्न केला असून नेहमीप्रमाणे मोठे मोठे आकडे सांगून काहीतरी भव्य केल्याचा आभास निर्माण केला आहे.मात्र प्रत्यक्षात शेतकरी,कष्टकरी,महिला,तरुण,मध्यम वर्गासह सामान्य जनतेची या अंतरिम अर्थसंकल्पाने घोर निराशा केली आहे. सर्वसामान्यांना लुटायचे आणि श्रीमंतांना वाटायचे हेच मोदी सरकारचे धोरण असून जुमलेबाज भाजपा सरकारचा आणखी एक जुमेलबाज अर्थसंकल्प असल्याचा थेट निशाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना साधला.
केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना पटोले म्हणाले की, पंतप्रधान किसान योजनेतून १२ कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत,पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात तसेच ४ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ, अन्नदात्याच्या उत्पादनासाठी एमएसपी वेळोवेळी वाढवली जात आहे असे सांगितले खरे परंतु एमएसपीचा कायदा अजून केलेला नाही.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला हमी भाव देणार, या आश्वासनाची पूर्तता १० वर्षात झालेला नाही.खते,बि बियाणे,डिझेल महाग केले असून शेती साहित्यांवरही जीएसटी लावून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. त्यामूळे १० वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. हे लक्षात घेता खतांच्या सबसिडीवर १३ टक्के एवढी मोठी कपात केली आहे.मात्र त्यामुळेच खतांच्या किमती वाढणार आहेत, असा आरोपही पटोले यांनी केला.
आयकर संकलनात वाढ झाल्याचे अर्थमंत्री सांगतात पण कार्पोरेट टॅक्सची वसुली घटली आहे.मध्यमवर्गियांची लूट व श्रीमंतांना सुट असे मोदी सरकारचे धोरण आहे.चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक धोरणांना काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. मोठ्या उद्योगपतींची ११ लाख कोटी रुपयांची कर्ज माफ केली आहेत. सर्व बाजूंनी गरिबांनी लुटायचे आणि मुठभर धनदांडग्यांना वाटायचे हेच भाजपा सरकारचे मागील १० वर्षात धोरण राहिल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
मोदी सरकारच ८० कोटी लोकांना मोफत राशन पुरवत असल्याचे जाहीरपणे सांगते,परंतु गरिबी रेषेत सुधारणा झाली असती तर ८० कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची गरजच काय? हे सरकारचे यश नाही तर मोठे अपयश आहे.मनरेगा निधीचे वाटप वाढवण्याचाही समावेश असल्याचे अर्थमंत्री म्हणतात पण युपीए सरकारने गरीब लोकांना ‘मनरेगा’ योजनेतून हक्काचा रोजगार दिला होता ही योजनाच मोडीत काडण्याचे काम मोदी सरकारने करत गरिबांच्या पोटावर पाय दिला आहे,त्यांच्या तोंडातील घास हिरावून घेतला आहे, याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.
केंद्रीय अर्थसंकल्पात समाज कल्याण, शिक्षण,आरोग्य,कृषी विभागावर तरतूद केलेल्या निधीतला कमी खर्च केला आहे.महिलांसाठी ३० कोटी रुपयांचे मुद्रा कर्ज,प्रधानमंत्री आवास योजनेतून ७० टक्के महिलांना घरे,बचत गटांना कर्जाची सोय,एक कोटी महिला ‘लखपती दिदी’ झाल्याचे सांगत आहेत, पण महिला सुरक्षेसंदर्भात बोंबाबोंबच असून महिलांवर अन्याय, अत्याचारांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या केवळ थापा मारल्या आहेत.मोदी सरकारच्या काळात महिला अधिकच असुरक्षित झाल्या आहेत.नोकरदार व मध्यम वर्गांसाठी महत्वाच्या असलेल्या आयकर रचनेत कोणताही बदल केलेला नसल्याबद्दल पटोले यांनी यावेळी तीव्र नाराजीही व्यक्त केली.