महाड : महाड तालुक्यातील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील विन्हेरे विभागात झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मलिकार्जुन नदीला अचानक पूर आला. नदीच्या पाण्याने विन्हेरे गावातील बागआळी परिसरात प्रवेश केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सह्याद्री पर्वतरांगांतील ताम्हणे देवाचा डोंगर परिसरात अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पाण्याचा मोठा लोंढा मलिकार्जुन नदीत आला. नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने बागआळी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी काही घरांच्या परिसरात शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली.
स्थानिक रहिवासी बंटी जंगम यांनी सांगितले की, सुमारे १९ वर्षांपूर्वीही ताम्हणे देवाचा डोंगर परिसरात अशाच प्रकारचा ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळीही मलिकार्जुन नदीला पूर येऊन बागआळी परिसरात पाणी शिरले होते. यंदाच्या पावसामुळे त्या घटनेची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. सध्या प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

