मुंबई : गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निधीपैकी ४० टक्के निधीही अद्याप वापरला गेलेला नाही, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. मते मिळवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या भाजपा युती सरकारने लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु १०० दिवस उलटूनही या बहिणींना अद्याप काहीच लाभ मिळालेला नाही. उलट सरकार लाभार्थी बहिणींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.
दावोस गुंतवणुकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करा
विधानसभेत वित्त, उद्योग, ऊर्जा, कामगार व खणीकरण, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि नियोजन विभागांवर चर्चा झाली.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, “राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरकारने दावोस मधून लाखो कोटींची इन्व्हेस्टमेंट आणली, पण प्रत्यक्षात हे उद्योग गेले कुठे? यातून किती रोजगार निर्माण झाले? सरकारने यावर श्वेतपत्रिका काढावी आणि जनतेला वस्तुस्थिती सांगावी.”
शेतकऱ्यांना १२ तास वीज कधी मिळणार?
• शेतकरी नव्या पद्धतीने शेती करून उत्पन्न वाढवत असताना सरकार त्यांना पुरेशी वीज देत नाही, असा आरोप पटोले यांनी केला.
• लोड वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे पंप निकामी होतात आणि दुरुस्तीला ४-५ दिवस लागतात.
• निवडणुकीपूर्वी १२ तास वीज देण्याचे आश्वासन दिले होते, पण सध्याच्या परिस्थितीत ८ तासही वीज मिळत नाही.
• अधिकारी शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा सल्ला देतात, पण अर्ज करून, पैसे भरूनही पाच-सहा महिने त्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
महाराष्ट्रात देशातील सर्वात महागडी वीज – हे दर कसे कमी करणार?
नाना पटोले यांनी सांगितले की,
“देशात सर्वात महागडी वीज महाराष्ट्रात आहे. हे विजेचे दर कसे कमी करणार? ऊर्जा विभागातील भ्रष्टाचार कसा रोखणार? यावर सरकारला उत्तर द्यावे लागेल.”
कर वाढीमुळे उद्योगपतींना महाराष्ट्र सोडण्याची वेळ
• राज्यातील कर वाढल्याने अनेक उद्योगपती महाराष्ट्र सोडून जात आहेत.
• नवीन उद्योग सुरू करण्याऐवजी विद्यमान उद्योगच राज्याबाहेर जात असल्याने यामुळे बेरोजगारी वाढत आहे.
• राज्य सरकार उद्योगांना चालना देण्यासाठी कोणते उपाययोजना करणार? याचे स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी पटोले यांनी केली.
कामगार आणि खाणींमध्ये भ्रष्टाचार
• कामगार विभाग कामगारांसाठी आहे की ठेकेदारांसाठी? असा सवाल करत पटोले म्हणाले की, “कामगारांसाठी निधी मंजूर केला जातो, पण तो प्रत्यक्षात कामगारांपर्यंत पोहोचतो का?”खाणीकरणामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असून गडचिरोलीतील आदिवासींना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सरकारने पाणंद रस्त्यांचे आश्वासन दिले होते, त्यावर कोणतीही हालचाल नाही. हे रस्ते कधी पूर्ण होणार, याचे उत्तर सरकारने द्यावे.
सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत – नाना पटोले
“सरकार आश्वासनांवर चालत नाही, कृती गरजेची आहे. बेरोजगारी, शेतकरी, उद्योग, वीज दर आणि पाणंद रस्त्यांबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी,” असे म्हणत नाना पटोले यांनी सरकारला जाब विचारला.