मुंबई, १८ जून: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ गुरुवारी मुंबईत विविध ठिकाणी शेतकरी आंदोलने करण्यात आली. गेटवे ऑफ इंडियाजवळ काही आंदोलकांनी समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले, तर मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने झाडावर चढून निदर्शने केली.
रविकांत तुपकर यांनी संपूर्ण कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि इतर शेतकरी मागण्यांसाठी १५ जूनपासून बुलढाणा येथील निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे.
मुंबईतील कुलाबा परिसरात गेटवे ऑफ इंडियाजवळ क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन करत समुद्रात उतरून शासनाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णयाची प्रतिकात्मक विल्हेवाट लावत संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी पुन्हा अधोरेखित केली.
या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी सुमारे दहा आंदोलकांना ताब्यात घेतले असून त्यांना काही काळासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते.
या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, राज्य समन्वयक सचिन पांडुळे, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सांगली संपर्कप्रमुख अजितराव गडदे तसेच इतर कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
दरम्यान, मंत्रालयासमोरील परिसरात लातूर येथील श्रीराम चलवाड यांनी झाडावर चढून निदर्शने केली. त्यांनी संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान त्यांनी काही सुतळी बॉम्ब खाली फेकल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवले.
रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.

