नागपूर
आज काँग्रेसच्या 139 वर्धापन दिनानिमित्ताने राहुल गांधीसह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नागपूरात उपस्थिती दर्शवली. यावेळी राहुल गांधींनी आपल्या भाषणात भाजपसह नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यावेळी म्हणाले, I.N.D.I.A आणि NDA यांच्यात विचारधारेचा लढा आहे. काही दिवसांपूर्वी मी लोकसभेतील एका भाजप खासदाराला भेटलो. ते मला म्हणाले, भाजपमध्ये गुलामगिरी आहे… वरून जे काही सांगितलं जातं, ते विचार न करता पाळावं लागतं.
सत्तेत येताच जातीय जनगणना
राहुल गांधी यांनी जातीय जनगणेवर बोट ठेवलं. आम्ही सत्तेत येताच जातीय जनगणना करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. ते म्हणाले, एकदा मी संसदेत विचारले – भारत 90 लोक चालवतात. यापैकी ओबीसी किती आहेत आणि दलित-आदिवासी किती आहेत. भाजपवाले गप्प बसले. ओबीसी लोकसंख्येच्या 50% आहेत. 19 पैकी 3 ओबीसी आहेत. त्यांना कोपऱ्यात ठेवलं जातं आणि लहान विभाग दिला जातो. भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी काढा, मला दाखवा त्यांच्यापैकी कोण ओबीसी, दलित किंवा आदिवासी आहे. राज्याची ब्युरोक्रेसी दाखवा. त्यांच्यामध्ये दलित, ओबीसी किंवा आदिवासी कुठे बसले आहेत?
काँग्रेसची लढाई इंग्रजांसह राजा-महाराजांविरोधात होती…
राहुल गांधी म्हणाले, आमच्या विचारधारेनुसार, देशाचा लगाम जनतेच्या हातात असायला हवा. सुरुवातील राजा-महाराज देश चालवत होते. तसं चालवायचं नाहीये. आम्ही जनशक्ती-लोकशक्तीबद्दल बोलतोय. जनता स्वातंत्र्यासाठी लढली होती. राजे लढले नाहीत. उलटपक्षी ते इंग्रजांसोबत होते. स्वातंत्र्याचा संघर्ष इंग्रजांविरोधात होता आणि त्यासह राजांविरोधातही होता. काँग्रेस गरीब जनतेसाठी लढत होती.