नवी दिल्ली
पंजाबच्या फतेहगड साहिबवरुन ट्रक आणि ट्र्रॅक्टरवरुन शेतकरी आज नवी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. सोमवारी १२ फेब्रुवारीच्या रात्री चंदीगडमध्ये साडेपाच तास चाललेल्या बैठकीत शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यात किमान आधारभूत किंमत हमी कायदा आणि कर्जमाफीवर एकमत होऊ शकले नाही. यानंतर किसान मजदूर मोर्चाचे निमंत्रक सर्वनसिंह पंढेर यांनी दिल्ली मोर्चाची घोषणा केली.
शेतकरी पंजाबमधून दिल्लीला निघाल्यानंतर हरियाणा आणि दिल्ली सीमेवर पोलीस आणि सुरक्षा दलांच्या हालचाली वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सीमेवर उंच बॅरिकेड्स लावण्याचे काम सुरू आहे. याशिवाय अनेक ठिकाणी काटेरी तारा, लावण्यात येत आहेत, याशिवाय 18,000 सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. यावरुन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जबर हल्ला केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
दिल्ली-सोनीपतची सिंघू सीमा सील करण्यात आली आहे. पंजाब हरियाणातून येणाऱ्या शेतकऱ्यांना येथे रोखण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिल्ली-बहादूरगडला लागून असलेली टिकरी सीमाही सील करण्यात आली आहे. झारोडा कलान सीमेवरुन शेतकरी बहादूरगडच्या बाजूने या मार्गावर येऊ शकतात. त्यांना याच सीमेवर रोखण्याची तयारी सुरू आहे. यूपीहून दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्ली-गाझीपूर सीमेवर रोखण्याची तयारी सुरू आहे. फरिदाबाद, हरियाणातून येणाऱ्या शेतकऱ्यांना बदरपूर सीमेवरच थांबवण्याची व्यवस्था आहे. नोएडाला लागून असलेल्या दिल्लीच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.