मुंबई : कथित मद्य घोटाळ्याच्या (Delhi liquor case) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना अटक केली आहे. या कारवाईनंतर आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. केंद्र सरकारच्या कारभारावर आणि भाजपवर ‘आप’नं अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या घोटाळ्याशी भाजपचा थेट संबंध आहे. केजरीवाल यांच्या विरोधात साक्ष देणारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हा भाजपचा देणगीदार आहे. इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून त्यानं भाजपला (BJP)६० कोटींची देणगी दिली आहे,’ असा घणाघात आरोप करत आम आदमी पक्षानं (AAP)भाजपला अडचणीत आणलं आहे.
दिल्ली सरकारमधील मंत्री आतिषी(Atishi) व अन्य नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. भाजपनं केजरीवाल यांच्या विरोधात कसं कटकारस्थान रचलं याचा खुलासा त्यांनी केला. ‘ईडी आणि सीबीआय गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीतील कथित घोटाळ्याची चौकशी करत होती. या सगळ्या काळात पैसे कुठून आले आणि कुठे गेले याचीच चर्चा होत होती. मात्र, आपच्या कुठल्याही मंत्र्याकडून, नेत्याकडून किंवा कार्यकर्त्यांकडून एक पैसाही तपास यंत्रणांना मिळाला नाही, असं आतिषी म्हणाल्या.
अरविंद केजरीवाल यांच्यावर शरथचंद्र रेड्डी नावाच्या एका माणसाच्या साक्षीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हा रेड्डी अरबिंदो फार्मा कंपनीचा मालक आहे. ९ नोव्हेंबर २२ रोजी त्याची पहिल्यांदा चौकशी करण्यात आली. आपण कधीही केजरीवाल यांना भेटलो नाही किंवा त्यांच्याशी बोललेलो नाही. आम आदमी पक्षाशी माझा संबंधच नाही, असं त्यानं सांगितलं. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीनं त्याला अटक केली. काही महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यानं आपली साक्ष बदलली. मद्य धोरणासंबंधात केजरीवालांशी बोललो होतो असं त्यानं सांगितलं. हे सांगताच त्याला तात्काळ जामीन मंजूर झाला, याकडं आतिषी यांनी लक्ष वेधलं.