मुंबई
राज्यात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापण्यास सुरुवात झालेली आहे. महायुती आणि मविआनं तयारी सुरु केली आहे. यात्रा, सभा, संघटनात्मक बैठका, जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. या सगळ्या स्थितीत राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आमदार पात्रतेचा निर्णय होणं अद्याप बाकी आहे. त्यातच मतदारसंघांच्या गरजांप्रमाणे पक्षप्रवेश सुरू झालेत. यात देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि संकटमोचक अशा ओशक असलेल्या गिरीश महाजनांनी मोठं वक्तव्य केलंय
काय म्हणाले गिरीश महाजन?
येत्या १० ते १५ दिवसांत राज्यात राजकीय भूकंप होईल, असं गिरीश महाजन नाशिकमध्ये म्हणाले. 2019 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांपूर्वी कांग्रेस, राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपत आले होते. त्यात महत्त्वाची भूमिका महाजनांनी बजावली होती. आता पुन्हा महाजनांनी संकेत दिल्यानं नेमकं काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले..
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी महाजन म्हणाले, म्हणजे त्यांनाच याची माहिती असेल, असं सांगत सस्पेन्स कायम ठेवला. तर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी महाजन म्हणतात, त्यात तथ्य असल्याचं म्हटलंय. १० तारीख महत्त्वाची आहे. त्या दिवशी कोण कुणाला पेढे भरवतो ते पहावं लागेल असंही ते म्हणाले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता, महाराष्ट्र म्हणजे जपान नाही, असं सांगत राजकीय भूकंप होणार नसल्याचा दावा केलाय.
शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निर्णय ११ जानेवारी पर्यंत लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलतील. अशात कोणता नवा भूंकप राज्यात होणार हा प्रश्न आहे. राष्ट्रवादीतील फुटीचा आणि आमदार अपात्रतेचा निर्णयही याच महिन्यात होणार आहे. त्यामुळं काहीतरी मोठं राज्यात घडण्याचे संकेत मिळतायत.