Twitter : @NalavadeAnant
मुंबई: केवळ आपल्या सुरात सूर मिसळत नाही म्हणून देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांवरील नामवंत पत्रकारांवर बहिष्कार टाकून विरोधकांच्या घमंडिया आघाडीने माध्यम स्वातंत्र्याच्या गळचेपीची हुकूमशाही मानसिकता दाखवून दिल्याची घणाघाती टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली.
इंडी आघाडीचा बहिष्काराचा पवित्रा म्हणजे माध्यमक्षेत्राला थेट धमकीचा इशारा असून पत्रकारांनी, पत्रकार व संपादकांच्या संघटनांनी याची गंभीर दखल घेत या हुकूमशाही मानसिकतेच्या विरोधात संघटित आवाज उठवावा, असे आवाहनही उपाध्ये यांनी केले.
उपाध्ये म्हणाले की, देशातील नामवंत पत्रकारांवर बहिष्काराची घोषणा करून या आघाडीने माध्यम क्षेत्राला पुन्हा आणीबाणीची आठवण करून दिली असून कॉंग्रेसने नेहमीच माध्यम क्षेत्राचा स्वार्थी गैरवापर केला. ‘नॅशनल हेराल्ड’ चा वापर करून एका कुटुंबाने आपले उखळ कसे पांढरे करून घेतले, याचे उदाहरण देशासमोर आहे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसने आणीबाणीच्या काळात पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली होती. आता कॉंग्रेससोबत फरफटत चाललेल्या विरोधकांनीही त्याचा कित्ता गिरवल्याची अनेक उदाहरणे असल्याचेही उपाध्ये यांनी यावेळी सांगितले.
आपल्या विरोधातील आवाज दाबून टाकायचा आणि स्तुती करणाऱ्यांचा उदोउदो करायचा ही घमंडिया आघाडीची प्रवृत्ती माध्यम क्षेत्राचाच नव्हे, तर संविधानाचा अपमान करणारी असून भाजप या प्रवृत्तीचा तीव्र निषेध करते, असेही उपाध्ये यांनी यावेळी नमूद केले.
आणीबाणीच्या काळात शेकडो पत्रकारांना तुरुंगवास भोगावा लागला होता. सरकारविरोधी साहित्याचे प्रकाशन आणि वितरण केल्याबद्दल ३ हजार न्यायालयीन खटले देखील दाखल झाले होते याची आठवणही उपाध्ये यांनी करून दिली.काँग्रेसच्या साथीत राज्यात सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना खोटे आरोप लावून एबीपी चे राहुल कुलकर्णी व रिपब्लिक टीव्ही च्या अर्णब गोस्वामींना अटक केली होती,याचे स्मरणही त्यांनी करून दिले.