महाराष्ट्र ताज्या बातम्या

उजव्या विचारसरणीच्या हल्ल्याला पराभूत करण्यासाठी शक्ती आणि एकता वाढवा – प्रकाश करात

सेलू, परभणी : जागतिक पातळीवर उजव्या विचारसरणीच्या साम्राज्यवादी शक्तींचा उदय, विशेषतः डोनाल्ड ट्रम्पच्या नेतृत्वाखाली, मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत आहे. यामुळे विनाशकारी युद्धे आणि उजव्या गटांची एकजूट अधिकाधिक वाढत आहे. मात्र, लॅटिन अमेरिका आणि श्रीलंका यांसह विविध देशांमध्ये डाव्या चळवळींनी प्रतिकार करत विजय मिळवले आहेत. याच पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या २४ व्या महाराष्ट्र राज्य परिषदेच्या उद्घाटन सत्रात प्रकाश करात यांनी भारतातील मोदी नेतृत्वाखालील आरएसएस-भाजप सरकारच्या नव-फॅसिस्ट, जातीयवादी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या राजवटीविरोधात संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन केले.

करात यांनी डावे आणि प्रगतीशील पक्षांनी स्वतःची ताकद वाढवण्यावर भर देत सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र आणून आरएसएस-भाजपला पराभूत करण्याचे आवाहन केले. देशभरात सीपीआय(एम) ने उभारलेल्या लढ्यांची माहिती देत त्यांनी हा संघर्ष आणखी व्यापक करण्याची गरज असल्याचे सांगितले.

सेलू, परभणी येथे झालेल्या या परिषदेची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. पक्षाचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम, उदयन शर्मा, दत्ता माने आणि शिवगोंडा खोत(वय ८०-८२ वर्षे) यांनी पक्षाचा झेंडा फडकवला. त्यानंतर प्रकाश करात, पोलिट ब्युरो सदस्य निलोत्पाल बसू, डॉ. अशोक ढवळे आणि उपस्थित प्रतिनिधींनी शहीदांना पुष्पांजली अर्पण केली. सोलापूर येथील प्रजा नाट्य मंडळ या कला गटाने क्रांतिकारी गीते सादर केली.

परिषदेच्या प्रारंभी सीपीआय(एम) परभणी जिल्हा सचिव उद्धव पोंळ यांनी परभणी, सेलू आणि मराठवाड्यातील डाव्या चळवळींचा इतिहास उलगडला. त्यानंतर प्रा. यू. आर. ठोंबळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

सत्राच्या शेवटी, सीपीआय(एम) राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी अध्यक्षीय भाषण करत, “कम्युनिस्ट ज्या स्वातंत्र्याची मागणी करत आहेत, ते म्हणजे मानवी स्वातंत्र्य आहे. आमचा संघर्ष गाझापासून परभणीपर्यंत आहे,” असे ठामपणे सांगितले.

त्यांनी परभणीतील पोलिस कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा तीव्र निषेध केला तसेच बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप सरकार सत्तेत आल्यावर हे दोन्ही हत्याकांड घडल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

डॉ. नारकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील हुतात्म्यांना आणि निजामशाहीविरोधात झालेल्या हैदराबाद मुक्तिसंग्रामातील लढवय्यांना अभिवादन केले.

परिषदेच्या शेवटी, स्वागत समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण शेरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात