कल्याण– लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याम मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावल्याचं दिसतंय. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक विकासकामांचंभूमिपूजन करतानाच, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना अश्वस्त करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलाय. यानिमित्तानं कल्याण-डोंबविली परिसरात मोठं शक्तिप्रदर्शनही त्यांनी घडवून आणलं. यामुळं कल्याण लोकसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांनाही त्यांनी संदेश दिल्याचं मानण्यात येतंय.
विकासकामांचा धडाका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमांच्या निमित्तानं आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन केलंय. यात कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग, डोंबिवलीत सूतिका गृह आणि कॅन्सर हॉस्पिटल, डोंबिवली पश्चिमेतेील फिश मार्केट, अंबरनाथमधील शिवमंदिराचा विकास अशा भूमिपूजनांचा धडाकाच रविवारच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला. बदलापूर ते कांजूरमार्ग या मेट्रोचं कामही लवकरच हाती घेण्यात येईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय.
ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या १५ वर्षांत झाली नाहीत, तेवढी विकास कामं गेल्या पाच वर्षांत हाती घेण्यात आलेली आहेत.कल्याण ते शिळफाटा मार्गाचं काँक्रिटीकरण, पत्री पुलाचं विस्तारीकरण, माणकोली पुलाचं काम, शीळ फाट्यावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुलाची निर्मिती, ऐरोली ते कटाई रस्ता असे अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षांत हाती घेण्यात आले असून ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
तसंच ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र आंतरजिल्हा बससेवा सुरु करण्याची घोषणाही काही काळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. नवी मुंबई महापालिकेची परिवहन वाहतूक सेवा सोडल्यास, ठाणे जिल्ह्यात कोणत्याही महापालिकेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पुरेशी नसल्याचं वारंवार स्पष्ट् झालेलं आहे. त्यातूनच एकत्रित परिवहन सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर या परिसरात चौथी मुंबई उभी राहतेय. या परिसरात वाहतूबक कोंडी ते पर्यायी मार्ग अशा अनेक समस्या आहेत. आत्तापर्यंत कोणत्याही राज्यकर्त्यांनी या भागाकडे पुरेशा गाँभिर्यानं लक्ष दिले नव्हते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या निमित्तानं या परिसरातील नागरिकांना न्याय मिळत असल्याची भावना व्यक्त होते आहे.
विकासाच्या जोरावर मतदारांना आकर्षित करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा प्रयत्न दिसतोय.
शक्तिप्रदर्शनातून विरोधकांनाही संदेश
कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपा आणि मनसेनंही यापूर्वी दावा केलेला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर या मतदारसंघात काय होणार, याची उत्सुकता राजकीय जाणकारांना होती. मात्र अत्यंत संयमानं भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेनं हा प्रसंग हाताळला. गायकवाड आत्ता तुरुंगात आहेत, तर गोळीबार झालेले शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांची रुग्णालयातून घरी रवानगी करण्यात आलेली आहे.
या प्रकरणानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात वातावरण निर्मिती होणार नाही, याची काळजी खुद्द मुख्यमंत्री घेत असल्याचं दिसतंय. शासन आपल्या दारीच्या निमित््तानं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कल्याण लोकसभा मतदारसंघात कार्यक्रम घेत, या मतदारसंघावर श्रीकांत शिंदे यांचाच दावा असल्याचं त्यांनी स्पष्ट केल्याचं मानण्यात येतंय. यातून मनसे आणि भाजपा नेत्यांनाही त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत.
हेही वाचा : पंतप्रधानांचे बौद्धिक, सत्तेनंतर 100 दिवसांचा कृती आराखडा; तिसऱ्यांदा जिंकण्यावर भाजप ठाम!