मुंबई
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेबाबत सवाल उपस्थित केला आहे. MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा व भाजपा युवा मोर्चाचा नेता अश्वजीत गायकवाड याने एका मुलीला कारखाली चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्याला अटक का नाही ? असा सवाल अतुल लोंढे यांनी केला आहे. कुंपन शेत खातंय असा आरोप यावेळी भाजप सरकारवर करण्यात आला.
काय आहे प्रकरण?
ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ओवळा भागात एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या मुलाने प्रेयसीसोबत झालेल्या वादातून तिच्या अंगावर कार घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, यात ती गंभीर झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रिया सिंग असं त्या जखमी तरुणीचं नाव आहे. स्वत: प्रियानेच घडलेला प्रकार कथन केला.
अश्वजीत विवाहित असल्याचं त्याने आपल्यापासून लपवून ठेवलं होतं. याबाबत प्रियाने त्याला जाब विचारताच पत्नीपासून विभक्त झाल्याची त्याने बतावणी केली होती. मात्र ११ डिसेंबर रोजी प्रियाने त्याला त्याच्या पत्नीसोबत पाहिलं होतं. यानंतर दोघांमध्ये वाद झाला.
प्रियाच्या संपूर्ण शरीरावर जखमा आहेत. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. अद्याप या घटनेतील मुख्य आरोपी अश्वजीत गायकवाड आणि त्याच्या मित्रांना अटक करण्यात आलेली नाही.
अश्वजीत गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या एमएसआरडीसी खात्याचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा पूत्र असल्याचं सांगितलं जात आहे.