X: @vivekbhavsar
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (BMC elections) नामांकन प्रक्रिया सुरू झाली असली, तरी सुरुवातीलाच समोर आलेल्या अंतर्गत आकडेवारीमुळे मुंबईतील काँग्रेसच्या (Mumbai Congress) संघटनात्मक क्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. TheRajkaran (राजकारण) ला मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक विधानसभा क्षेत्रांमध्ये (Assembly segment) काँग्रेसकडे अद्याप एकही इच्छुक उमेदवार पुढे आलेला नाही आणि काही ठिकाणी उमेदवारांचा शोध अजूनही सुरू आहे.
मुंबई काँग्रेस कार्यालयात आतापर्यंत एकूण ६७० इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ६०१ अर्ज हे सर्वसाधारण, महिला, ओबीसी (OBC) आणि ओबीसी महिला (OBC woman reserve) प्रवर्गातून आले असून, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून (SC – ST) केवळ ६९ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र या आकडेवारीआड लपलेली खरी बाब म्हणजे मुंबईतील ३० हून अधिक प्रभागांमध्ये काँग्रेसकडे शून्य इच्छुक अशी स्थिती आहे.
उत्तर-पूर्व मुंबईत ही स्थिती विशेषतः ठळक आहे. भांडुप विधानसभा क्षेत्रातील प्रभाग ११२, घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रातील प्रभाग १३२, तसेच घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील १२६, १२७, १२८, १२९ आणि १६० या सर्व प्रभागांमध्ये काँग्रेसकडे अद्याप एकाही इच्छुकाने अर्ज केलेला नाही. मानखुर्द–शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग १३७ आणि विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील १११ व ११७ या प्रभागांमध्येही उमेदवार शोध सुरू आहे.
उत्तर मुंबईत परिस्थिती अधिकच गंभीर आहे. बोरिवली विधानसभा क्षेत्रातील प्रभाग १३, १४ आणि १५, चारकोप विधानसभा क्षेत्रातील १९, २१ आणि ३०, तसेच दहिसर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग ६ येथे एकाही इच्छुकाने काँग्रेसकडे अर्ज केलेला नाही.
उत्तर-पश्चिम मुंबईत अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील प्रभाग १२१ आणि जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील ५२ व ७३ या प्रभागांमध्येही काँग्रेसकडे इच्छुक उमेदवार नाहीत. मध्य मुंबईत चेंबूर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग १५३, सायन–कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील १७२ व १७३ आणि वडाळा विधानसभा क्षेत्रातील प्रभाग १७७ येथेही हीच परिस्थिती आहे.
दक्षिण मुंबईत तर काँग्रेसची अवस्था अधिकच अडचणीत दिसते. मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील प्रभाग २१९, शिवडी विधानसभा क्षेत्रातील २०३, तसेच वरळी विधानसभा क्षेत्रातील १९६, १९८ आणि १९९ या प्रभागांमध्ये सध्या काँग्रेसकडे एकही इच्छुक उमेदवार उपलब्ध नाही.
हे सर्व अशा वेळी घडत आहे की काँग्रेसने बीएमसी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे यांच्या युतीपासून (UBT Sena -MNS Alliance) काँग्रेस दूर आहे. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अद्याप काँग्रेससोबत जाण्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही, तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) मुंबईतील रणनीतीही अजून अस्पष्ट आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणावर विधानसभा क्षेत्रांमध्ये इच्छुकांचा अभाव असणे हे काँग्रेसच्या कमकुवत बूथ नेटवर्क, स्थानिक नेतृत्वाचा अभाव आणि निर्णय प्रक्रियेतील गोंधळाचे स्पष्ट द्योतक आहे. काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मान्य केले की पक्ष अजूनही निवडणूक लढण्यासाठी अनेक संभाव्य इच्छुकांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या टप्प्यावर होणारा विलंब म्हणजे प्रचार सुरू होण्यापूर्वीच पक्ष पिछाडीवर पडण्यासारखे असल्याचेही त्यांनी कबूल केले.
इतर पक्ष जिथे प्रभागनिहाय तयारीला वेग देत आहेत आणि युतीचे चित्र स्पष्ट होत चालले आहे, तिथे ही सुरुवातीची आकडेवारी काँग्रेससमोर एक कठोर प्रश्न उभा करते — बीएमसी निवडणूक एकटीने लढवण्याचा निर्णय घेणाऱ्या काँग्रेसकडे प्रत्यक्षात तेवढे उमेदवार आहेत का?

