मुंबई
पंकजा मुंडेंची राज्यसभेत वर्णी लागणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आज स्पष्टच सांगितलं.
येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणूक पार पडणार आहेत. यंदा महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. यामध्ये प्रकाश जावडेकर, नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही मुरलीधरन आणि वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. भाजपने एक यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली असून यात ९ जणांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.
या यादीत नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, संजय उपाध्याय, अमरिश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी (६ फेब्रुवारी) पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. त्यावेळी पंकजा मुंडेंना राज्यसभेत संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
याबाबत फडणवीसांना विचारलं असता ते म्हणाले, राज्यसभेवर कोण जाईल याचा निर्णय दिल्लीतील वरिष्ठ नेते घेणार आहेत. पंकजा मुंडे ह्या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यांना राज्यसभेवर संधी मिळेल की लोकसभेत, किंवा पक्षात कुठलं पद मिळेल, याचा निर्णय केंद्रामध्ये होणार आहे. जो निर्णय होईल तो चांगलाच होईल असंही फडणवीस म्हणाले.