X: @therajkaran
मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेच कायम राहणार, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिली.
शिवसेना अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय योग्यच असल्याचे सांगत त्याबद्दल त्यांनी राहुल नार्वेकर यांचे स्वागत केले. आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल आणि मुख्यमंत्री म्हणूनही एकनाथ शिंदे हेच राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी दिलेला निकाल हा कायदेशीरच असून अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच त्यांनी मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे, आणि त्याला वैध ठरवले आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच आमचे सरकार स्थिर असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत आता कोणाच्या मनात काही शंका असल्याचे कारण नाही, हेच सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात हे सरकार मजबुत आणि भक्कम असल्याचे आम्ही प्रारंभीपासून सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते. पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. विधानसभाध्यक्षांनीच विविध नियमांचा दाखला घेत निकाल दिल्याने आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
Also Read: महाराष्ट्र व देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा येईल : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला