मुंबई- कोकणात शिमगोत्सवाला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच चाकरमानी शिमगोत्सवाला गर्दी करताना दिसले. शिमगोत्सवाच्या या उत्सवात आणि उत्साहात, कुजबूज होती ती लोकसभा निवडणुकीची. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार, याची चर्चा सगळशीकडं रंगल्याचं पाहायला मिळालंय. राज्यात भाजपाच्या २३ उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी अद्यारपही रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार कोण, हा सस्पेन्स मात्र कायम दिसतोय. शिमगोत्सवाच्या निमित्तानं राजकीय नेते गावोगावात याच चर्चा करताना दिसत होते.
महायुतीची उमेदवारी कुणाला?
रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीची उमेदवारी कुणाला आणि ठाकरे शिवसेनेच्या विनायक राऊतांना कोण आव्हान देणार, याची चर्चा दिसत होती. नारायण राणे, प्रमोद जठार आणि किरण सामंत अशा तीन नावांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरुये. यावर नितेश राणेंनी महायुतीच्या नेत्यांत चांगलं अंडरस्ँटगडिंग असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. कोकणातील निवडणूक ७ मे रोजी आहे. अजून फॉर्म भरण्याला वेळ आहे. कुणाचेही नाव आले तरी आम्ही प्रचार करू. आम्हाला मोदींना ४०० प्लस आकडा द्यायचा आहे. ज्याला उमेदवारी देतील त्याला निवडून आणू, असं त्यांनी सांगतिलंय.
शिंदेंची शिवसेना आणि भाजपात चुरस
मतदारसंघ मिळावा यासाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजपात जोरदार चुरस असल्याचं दिसतंय. हा राजकीय शिमगा गेल्या काही दिवसांपासून सुरुये. राणेंमुळे भाजपाची वाढलेली ताकद आणि संधी पाहता यंदाची वेळ गमवायची नाही, असा पण भाजपा नेत्यांनी केल्याचं दिसतंय. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. नारायण राणेंनी निवडणूक लढवावी अशी पक्षश्रेष्ठींचीही इच्छा आहे. राणे मात्र प्रकृतीमुळं स्वतः फारसे इच्छुक नसल्याचं सांगण्यात येतंय.
राणेंऐवजी कुणाला संधी?
राणेंनी लोकसभा लढवली तर त्यांच्या दोन्ही पुत्रांना नीलेश राणे आणि नितेश राणे विधानसभेचं तिकीट भाजप देईल का हाही प्रश्न आहेच. त्यामुळे अन्य उमेदवाराचा प्रचार करण्याची तयारी राणेंनी केलीय. राणे नसतील तर प्रमोद जठारांना संधी मिळण्याचीही शक्यता आहे. त्यांचंही नाव भाजपाकडून चर्चेत आहे. जठारांना संधी मिळाली तर त्यांच्यासाठी राणे प्रयत्न करतील, अशीही चर्चा रंगतेय.
किरण सामंतांचं काय होणार?
दुसरीकडे शिवसेनेकडून किरण सामंत हेच एकमेव नाव आघाडीवर आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू म्हणून त्यांची ओळख आहे.याशिवाय दांडगा जनसंपर्क, मतदारसंघाची चांगली जाणही चांगली आहे. सर्वच दृष्टीने ते सबळ उमेदवार आहेत. त्यांचे राणेंसह ठाकरेंच्या शिवसेनेशीही चांगले संबंधही आहेत आणि
सिंधुदुर्गापासून ते रत्नागिरीच्या शेवटच्या टोकापर्यंत नेटवर्कही आहे. त्यामुळं या राजकीय धुळवडीत धुष्यबाणाचाच खासदार होईल, असं उदय सामंत सांगतायेत. दुसरीकडे शालेय शिक्षण मंत्री आणि दीपक केसरकर यांनी आता राणेंना पूरक भूमिका घेण्यास सुरुवात केलीय.
विधानसभा निवडणुकीत सांवतवाडी मतदारसंघात राणे आणि भाजपाची मदत गरजेची असल्यानं केसरकरही भाजपाच्या सूरात सूर घालून बोलताना दिसतायेत.
विनायक राऊतांचा काय दावा
राणेंबाबत आक्रमक असलेल्या केसरकरांचा सूर मवाळ झाल्यानं राणेंनाच संधी मिळण्याची शक्यता वाढलीय. तर नारायण राणेंचं आपल्यासमोर उभं राहण्याचं धाडसच नाही, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत करतायेत. अडीच लाखांच्या मताधिक्यानं विजयाचा विश्वासही ते व्यक्त करतायेत. कोकणात शिमगोत्सव सुरू असला तरी या राजकीय धुळवडीचा शेवट काय होणार, महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार, याची उत्सुकता सगळ्यांना आहे.