महाड: कोकण रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. मात्र अवघ्या दोन वर्षांतच या कामांचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक स्थानकांवरील नव्याने बांधलेली स्वच्छतागृहे आजही बंद अवस्थेत असून, देखभालअभावी परिसरात अस्वच्छता पसरली आहे. शोभेची रोपटी पाण्याअभावी सुकून गेल्याने सुशोभीकरणाचा उद्देशच हरवल्याची टीका प्रवाशांकडून केली जात आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्थानकांवर राज्य शासनाच्या माध्यमातून सुशोभीकरणाची कामे करण्यात आली होती. महाडजवळील वीर, तसेच रोहा, माणगाव, कोलाड, इंदापूर आदी स्थानकांवर लोखंडी संरचना, भव्य शेड, विद्युत रोषणाई, शोभेची झाडे आणि प्रवाशांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यात आली. मात्र देखभाल-दुरुस्तीअभावी ही कामे अल्पावधीतच निकृष्ट अवस्थेत पोहोचली आहेत.

वीर रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक महाड शहराला जोडणारे प्रमुख स्थानक आहे. रायगड किल्ला आणि महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळे सत्याग्रहामुळे देशभरातून लाखो पर्यटक येथे येतात. असे असतानाही स्थानकावरील मूलभूत सुविधा आजही अपुऱ्या असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानक परिसरात धूळ, घाण आणि दुर्लक्षित अवस्थेतील संरचना दिसून येत आहेत. शोभेच्या कुंड्यांतील रोपटी सुकली असून, मार्गदर्शन फलकही कोलमडलेल्या अवस्थेत आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रवाशांसाठी नव्याने बांधण्यात आलेली स्वच्छतागृहे उद्घाटनानंतरही बंदच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांना जुन्याच स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत आहे.
‘वीर-महाड’ नामकरणाची मागणी कायम
महाडमध्ये येण्यासाठी प्रवाशांना वीर स्थानकावर उतरावे लागते. मात्र ‘वीर’ हे नाव पाहून बाहेरून येणाऱ्या अनेक प्रवाशांचा गोंधळ उडतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून या स्थानकाचे नाव ‘वीर-महाड’ करण्याची मागणी होत आहे. राज्य शासनाने सुशोभीकरणासाठी निधी दिल्यानंतर तरी स्थानकावर ‘महाड’चा उल्लेख होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आजही स्थानकावर केवळ ‘वीर’ हेच नाव कायम आहे.
महाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीचे केंद्र मानले जाते. तसेच रायगड किल्ल्यामुळे शिवप्रेमींचीही येथे मोठी वर्दळ असते. असे असतानाही रेल्वे प्रशासनाने या ऐतिहासिक महत्त्वाकडे दुर्लक्ष केल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

