X: @therajkaran
भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करून पाच लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) धक्कातंत्राचा वापर केला आहे. आता यावरून शिवसेनेचे तीन मंत्री केंद्रात जाणार असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले आहे. सांदीपान भुमरे (Sandipanrao Bhumre) हे संभाजीनगर मधून तर तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे धाराशिवमधून लोकसभा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासह यवतमाळ- वाशिममधून संजय राठोड (Sanjay Rathod) हे लोकसभा लढवण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर भावना गवळी (Bhavna Gawali) यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
‘काही लोकं ज्येष्ठ आहेत. त्यांनी आता लोकसभेत जावे, असे काही आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे देखील मत आहे. त्यामुळे तीन मंत्री तरी यंदा केंद्रात खासदारकीची निवडणूक लढवतील’, असे वक्तव्य शिरसाट यांनी केलं. शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना लोकसभेचं तिकीट मिळणार आहे. या नावांची घोषणा लवकरच होईल. मुख्यमंत्री स्वतः त्या नावांची घोषणा करतील, असेही शिरसाट म्हणाले. गडचिरोली – चिमूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम (Dharmaraobaba Atram) यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल असं चित्र आहे.
राज्यातून भाजपला (BJP) 45 पेक्षा अधिक खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी पक्षाने सुक्ष्म स्तरावर अहवाल तयार केला असून त्या अहवालात ज्या खासदाराच्या विरोधात जनमत असल्याचे दिसतंय त्याचे तिकीट कापण्यात येणार आहे. त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता असलेला उमेदवार देण्यात येणार आहे. विदर्भातही (Vidarbha) हीच चाल भाजपकडून खेळण्यात येणार आहे. विदर्भात या आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) असे दोन उमेदवार जाहीर केले आहेत. आता इतर चार ठिकाणी नवीन चेहरे देण्यासाठी हालचाल सुरू आहे.