मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात झालेला संघर्ष हा केवळ एका प्रकल्पापुरता मर्यादित नव्हता; तो राज्याच्या राजकीय संस्कृतीचा आरसा ठरला. हजारो कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या खर्च, गुणवत्ते आणि सुरक्षिततेबाबत विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकारने हे आरोप फेटाळून विरोधकांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला. मात्र या वादातून सर्वाधिक चर्चेत राहिली ती सभागृहातील भाषा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना काही तीव्र शब्दांचा वापर केला. त्यानंतर विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सार्वजनिक सभेत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका केली. त्यामुळे प्रकल्पापेक्षा सभागृहातील राजकीय संवादाचा स्तरच चर्चेचा केंद्रबिंदू बनला.
लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे हा विरोधकांचा अधिकार आहे आणि त्या प्रश्नांना तथ्यांवर आधारित उत्तर देणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी. पण जेव्हा युक्तिवादाची जागा व्यक्तिवाद घेतो आणि मुद्द्यांपेक्षा शब्दांवर संघर्ष सुरू होतो, तेव्हा लोकशाहीची गुणवत्ता कमी होऊ लागते. सभागृहातील प्रत्येक शब्द हा केवळ त्या दिवसापुरता मर्यादित राहत नाही; तो समाजातील राजकीय संवादाची दिशाही ठरवत असतो.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाकडे पाहिले, तर मतभेद तीव्र होते; परंतु संसदीय संकेत जपण्याची परंपरा तितकीच मजबूत होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विकासाला प्राधान्य देताना विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची शैली जपली. दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला कठोर प्रश्न विचारले, पण चर्चेचा केंद्रबिंदू मुद्दे असत. नारायण राणे यांनीही आक्रमक राजकारण केले, तरी विकासाच्या प्रश्नांवर सरकारने उत्तरदायी राहावे, ही भूमिका कायम ठेवली.
या तिन्ही नेत्यांच्या शैली वेगळ्या होत्या, पण एक समान धागा होता—राजकीय संघर्ष हा लोकशाहीचा भाग आहे; मात्र सभागृहाची प्रतिष्ठा अबाधित राहिली पाहिजे.
आज ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरील वादाने पुन्हा एकदा तोच मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. प्रकल्पाचा खर्च का वाढला? कामाच्या मुदतीत बदल का झाले? तांत्रिक अडचणी कोणत्या होत्या? सुरक्षिततेचे निकष कितपत पाळले गेले? पर्यावरणीय अटींची अंमलबजावणी कशी झाली? अशा प्रश्नांची अधिकृत आणि तपशीलवार उत्तरे जनतेसमोर येणे आवश्यक आहे.
विरोधकांनी हे प्रश्न विचारणे ही त्यांची लोकशाहीतील भूमिका आहे. त्याचप्रमाणे सरकारनेही कागदपत्रे, आकडेवारी आणि तथ्यांच्या आधारे त्यांची उत्तरे देणे ही लोकशाहीची अपेक्षा आहे. केवळ घोषणांनी किंवा राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी जनतेचा विश्वास निर्माण होत नाही; तो पारदर्शकतेतून निर्माण होतो.
आजचे राजकारण सोशल मीडियाच्या वेगाने धावते. सभागृहातील प्रत्येक वाक्य काही क्षणांत लाखो लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे मुख्यमंत्री असोत, विरोधी पक्षनेते असोत किंवा कोणताही लोकप्रतिनिधी—त्यांच्या प्रत्येक शब्दाचे राजकीय आणि सामाजिक परिणाम अधिक व्यापक झाले आहेत. म्हणूनच सार्वजनिक जीवनातील भाषेची जबाबदारीही पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे.
लोकशाही केवळ बहुमतावर चालत नाही; ती संवादावरही उभी असते. मोठे प्रकल्प उभारणे हे सरकारचे यश असू शकते, परंतु त्या प्रकल्पांबाबतचे प्रश्न शांतपणे ऐकून त्यांची समाधानकारक उत्तरे देणे ही लोकशाहीची खरी कसोटी असते.
मुंबई–पुणे मार्गावरील प्रत्येक किलोमीटर हा केवळ काँक्रीटचा तुकडा नाही; तो करदात्यांच्या पैशांचा, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि शासनावरील विश्वासाचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकल्पावरील चर्चा व्यक्तींवर नव्हे, तर पुरावे, तथ्ये आणि उत्तरदायित्वावर केंद्रित असली पाहिजे.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाने अनेक तीव्र संघर्ष पाहिले, अनेक सत्तांतरे अनुभवली आणि असंख्य आरोप-प्रत्यारोपही ऐकले. पण त्या इतिहासाची खरी ताकद मतभेदांत नव्हती; ती संवाद टिकवून ठेवण्यात होती.
आज खरी गरज ‘मिसिंग लिंक’ची नाही; तर राजकारणातील हरवत चाललेली संवादाची लिंक पुन्हा जोडण्याची आहे. कारण सभागृहाची भाषा बदलली, तर लोकशाहीचाही चेहरा बदलतो.

