मुंबई : राज्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि नागरिकांना अधिक परिणामकारक व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS) आणि ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) या समित्यांवर आरोग्य व्यवस्थेच्या देखरेखीची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. या समित्यांच्या प्रभावी कार्यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळू शकतात, असे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ग्रामीण आणि शहरी भागात विविध योजनांद्वारे आरोग्य सेवा दिल्या जातात. या योजनांची काटेकोर अंमलबजावणी आणि स्थानिक गरजांनुसार सेवा पुरवण्यासाठी समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
ग्रामीण भागात ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) आणि शहरी भागात महिला आरोग्य समिती (MAS) कार्यरत आहेत. स्वच्छता, पोषण, पाणीपुरवठा आणि प्राथमिक आरोग्य सेवा यामध्ये या समित्या महत्त्वाची भूमिका बजावतात.
त्याचप्रमाणे जन आरोग्य समिती (JAS) आणि रुग्ण कल्याण समिती (RKS) या समित्या आरोग्य संस्थांमध्ये रुग्णकेंद्रित सेवा, सेवांची गुणवत्ता आणि निधीचा पारदर्शक वापर यावर लक्ष ठेवतात.
ग्राम स्तरावर कार्यरत असलेल्या VHNSC मध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य (प्राधान्याने महिला), बचत गट, तरुण मंडळ, सामाजिक संस्था, गरोदर व स्तनदा माता तसेच आरोग्य सेवा घेतलेले नागरिक यांचा सहभाग अपेक्षित आहे.
शहरी भागातील MAS मध्ये सामाजिक बांधिलकी असलेल्या झोपडपट्टी भागातील जास्तीत जास्त २० महिला सदस्यांचा समावेश केला जातो.
ग्रामीण आणि शहरी भागातील जन आरोग्य समित्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्यदूत, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक प्रतिनिधी यांचा समावेश करून स्थानिक पातळीवर आरोग्य व्यवस्थापन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जातो.
जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमधील रुग्ण कल्याण समित्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, एनजीओ प्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिकांचा सहभाग असतो.
आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, या सर्व समित्यांचे पुनरुज्जीवन करताना लोकप्रतिनिधी, प्रशासन, आरोग्य अधिकारी आणि समाजातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. नियमित बैठका घेऊन स्थानिक समस्यांवर कृती आराखडे तयार करणे, सदस्यांचे प्रशिक्षण आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे.
“लोकसहभागातूनच आरोग्य सेवा अधिक परिणामकारक होऊ शकते. स्थानिक गरजा ओळखून तत्काळ उपाययोजना केल्यास नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल,” असे त्यांनी नमूद केले.
राज्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

