मुंबई: ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसान शंकर कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे. कथोरे यांनी या संदर्भात दोन स्वतंत्र पत्रे पाठवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची तत्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
ठाणे जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि अवकाळी पर्जन्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये पिकं पाण्याखाली गेली असून, भात, नागली, वरई, फळबागा, भाज्या आणि इतर पिकांवर पूर आणि आर्द्रतेचा गंभीर परिणाम झाला आहे.
आमदार कथोरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उभ्या पिकांची स्थिती बिकट झाली आहे. कष्टाने उभे केलेले पीक हातातून जात असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. शासनाने या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई द्यावी.”
कथोरे यांनी नमूद केले आहे की, ऑक्टोबर 2025 महिन्यातील 19 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत ठाणे आणि कोकण प्रदेशात अतिवृष्टी झाली. या अवकाळी पावसामुळे पिके जमिनीतच सडू लागली आहेत आणि उत्पादनाचा दर्जाही खराब झाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उत्पन्न शिल्लक राहिले नाही. अनेक भागांतील शेतकरी कर्जबाजारी झाले असून, उपजीविकेचे साधनही हरपले आहे.
“शासनाच्या कृषी विभागाने तातडीने प्रत्येक तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करावे आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी,” अशी ठाम मागणी कथोरे यांनी पत्रात केली आहे.
त्यांनी असेही नमूद केले की, कोकणातील शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. अशा परिस्थितीत सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य दोन्ही डळमळीत झाले आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून दिलासा दिला नाही, तर पुढील हंगामासाठी शेतकरी बी-बियाणं विकत घेण्याच्या स्थितीत राहणार नाहीत.
कथोरे यांनी पत्रात नमूद केले आहे की, या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे भातपीक तर नुकसानग्रस्त झालेच आहे, पण फळबागा, भाज्यांचे पीक आणि पशुपालनावरही गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने कृषी विमा कंपन्यांशी समन्वय साधून विमा दावे जलदगतीने निकाली काढावेत आणि शेतकऱ्यांना थेट बँक खात्यावर मदत जमा करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
या पत्रांद्वारे आमदार कथोरे यांनी ठाणे जिल्हा प्रशासनासोबतच कोकणातील इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले की, “माझ्या मुरबाड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण ठाणे जिल्हा आणि कोकण परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत.”
कथोरे यांनी पुढे म्हटले की, ‘अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे जगणेच कठीण झाले आहे. अशा वेळी सरकारने संवेदनशीलता दाखवून तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा.’
आमदार कथोरे यांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या संदर्भात तातडीने बैठक घेऊन संपूर्ण कोकण विभागासाठी मदत पॅकेज जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, कोकणातील शेतकऱ्यांनी नेहमीच राज्याच्या अन्नसुरक्षेसाठी योगदान दिले आहे. आज या शेतकऱ्यांचे जीवन वाचवण्यासाठी सरकारने पुढे येणे हेच खरी जबाबदारी ठरेल.
त्यांनी पत्रात प्रामुख्याने पुढील मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. ठाणे आणि कोकणातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक नुकसान, जिल्हाधिकारी व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व विमा भरपाई देण्यात यावी, पुढील हंगामासाठी बियाणे, खत व औषधांची मोफत उपलब्धता करावी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने बैठकीत निर्णय घ्यावा.

