मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शासन निर्णय २००८ व २०१५ ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत मुंबई महानगरपालिकेने नव्याने उभारलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच या योजनेची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या मागणीसाठी म्युन्सिपल मजदूर युनियनच्या वतीने २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र आंदोलनापूर्वीच अण्णा बनसोडे यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणली आणि तोडगा काढण्यात यश मिळवले.
मुंबई महापालिका क्षेत्रातील ३६ वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले असून सुमारे १२,२०० नवीन घरे उभारण्यात आली आहेत. यापैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना देण्याच्या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना स्थिर निवासाची संधी मिळणार आहे.
या बैठकीस अण्णा बनसोडे, म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, वामन कविस्कर, हिंदुराव जाधव, यशवंत देसाई, अरुण नाईक आदी उपस्थित होते.

