महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरेंचा मराठवाड्यातील बुरुज ढासळतोय? ‘ऑपरेशन टायगर’ने बदलली राजकीय समीकरणे

Political map of Marathwada showing shifting influence in Operation Tiger and impact on Uddhav Thackeray’s stronghold.

मराठवाडा हा एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. मात्र २०२२ मधील शिवसेना फुटीनंतर सुरू झालेल्या राजकीय घडामोडींनी या बालेकिल्ल्याला मोठे तडे दिले आहेत. आता ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या घडामोडींमुळे मराठवाड्यातील ठाकरे गटासमोर मोठे संघटनात्मक आव्हान उभे राहिले असले, तरी अंतिम राजकीय चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेचे केंद्रबिंदू मराठवाड्यातील काही खासदार ठरले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या अनेक नेत्यांपैकी काहींनी आता वेगळी राजकीय दिशा स्वीकारण्याची चिन्हे दिसू लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ओमराजे निंबाळकरांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे एक वेळेस आमदार आणि दोन वेळेस खासदार म्हणून शिवसेनेकडून निवडून आले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ३ लाख २९ हजार मताधिक्याने विजय मिळविला होता. मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये विरोधी पक्षाचे आमदार असतानाही त्यांनी मिळविलेला विजय हा त्यांच्या वैयक्तिक जनाधाराचा पुरावा मानला जातो.

मात्र विरोधी पक्षात राहून विकासकामे गतीने मार्गी लावणे कठीण होत असल्याची भावना अनेक लोकप्रतिनिधींमध्ये असते. विकासकामांसाठी सत्तेच्या जवळ जाण्याची राजकीय गरज आणि मतदारसंघाच्या अपेक्षा या दोन्ही गोष्टींचा विचार करूनच निंबाळकर यांच्यासह काही नेते नव्या राजकीय पर्यायांचा विचार करीत असल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

ठाकरे समर्थकांचा मराठवाड्यातील प्रभाव कमी होत गेला

मराठवाडा हा अनेक दशकांपासून शिवसेनेचा प्रभावी प्रदेश राहिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेला मोठा शिवसैनिक वर्ग येथे होता. मात्र कालांतराने ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले अनेक प्रभावी नेते विविध कारणांनी पक्षापासून दूर गेले. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील नेतृत्वात निर्माण झालेली पोकळी, बदलती राजकीय समीकरणे आणि सत्तेपासून दूर राहिल्याचा परिणाम यामुळे ठाकरे गटाची ताकद कमी होत गेल्याची चर्चा मराठवाड्यात होत आहे.

परभणीचा राजकीय इतिहास आणि संजय जाधव

परभणी लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिला तर शिवसेनेतून निवडून आलेल्या अनेक नेत्यांनी नंतर वेगळी राजकीय वाट निवडलेली दिसते. दिवंगत अशोकराव देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे पाटील आणि गणेशराव दुधगावकर या नेत्यांनी विविध टप्प्यांवर शिवसेनेची साथ सोडली होती.

सध्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचाही राजकीय प्रवास शिवसेनेच्या संघटनात्मक राजकारणातून घडलेला आहे. जिल्हाप्रमुख, नगरसेवक, बाजार समिती सभापती, आमदार आणि नंतर खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. २०१४ पासून ते परभणी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असून सध्या त्यांची खासदारकीची तिसरी टर्म सुरू आहे.

२०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. मात्र गेल्या काही महिन्यांत त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल होत असल्याचे संकेत दिसू लागले होते. पक्षाच्या काही बैठकींना अनुपस्थित राहणे, स्थानिक स्तरावरील नाराजी आणि समर्थकांमधील अस्वस्थता यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली. परभणी जिल्ह्यात सातत्याने जनसंपर्क ठेवणारे आणि विविध उपक्रम राबविणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

हिंगोलीतील आष्टीकरांचा राजकीय पेच

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काही दिवसांपूर्वी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याचेही समोर आले होते. मात्र त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यांच्या कुटुंबाची राजकीय भूमिका आणि बदलती राजकीय परिस्थिती यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेबाबतही चर्चा सुरूच राहिली.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर विलास गुंडेवार, शिवाजी माने, सुभाष वानखेडे आणि हेमंत पाटील यांसारख्या नेत्यांनी शिवसेनेकडून प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघातही शिवसेनेतील अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर राजकीय भूमिका बदलल्याचा इतिहास आहे.

शिंदे सेनेची रणनीती प्रभावी?

गेल्या चार वर्षांत मराठवाड्यात ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना असे स्पष्ट राजकीय चित्र दिसून आले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील मोठ्या प्रमाणावरील बंड यशस्वी करून राज्यातील राजकारणाची दिशा बदलली. त्यानंतर संघटन विस्तार, स्थानिक नेतृत्वाला संधी आणि सत्तेच्या माध्यमातून विकासाचा मुद्दा यावर भर देत शिंदे गटाने आपली ताकद वाढविली.

राजकीय विश्लेषकांच्या मते, ठाकरे गटातील काही खासदार आणि नेत्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता ओळखून शिंदे गटाने आखलेली रणनीती प्रभावी ठरत आहे. त्याचवेळी विरोधकांकडून सत्ताधारी आघाडीवर विविध प्रकारचे आरोपही होत आहेत. मात्र या सर्व घडामोडींमुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

अंतिम चित्र अजून स्पष्ट नाही

चार वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेना फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात सुरू झालेल्या पुनर्रचनेचा नवा अध्याय आता ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून समोर येत आहे. मराठवाड्यातील काही प्रमुख खासदारांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटासमोर संघटनात्मक आणि राजकीय आव्हान निर्माण झाले आहे. एकेकाळी ठाकरे कुटुंबाचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मराठवाड्यात आता नव्या राजकीय वास्तवाची चाहूल लागली आहे.

तथापि, काही निर्णय अद्याप औपचारिकरीत्या झालेले नसल्याने आणि स्थानिक पातळीवर ठाकरे गटाचे कार्यकर्ते व संघटनात्मक जाळे कायम असल्याने अंतिम राजकीय चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मराठवाड्यातील सध्याच्या हालचाली केवळ पक्षांतरापुरत्या मर्यादित नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील सत्तासमीकरणांची दिशा ठरवणाऱ्या ठरू शकतात.

Dr Abhaykumar Dandage

Dr Abhaykumar Dandage

About Author

डॉ अभयकुमार दांडगे (Dr Abhaykumar Dandge) हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार असून मराठवाडा हा त्यांचा लेखनाचा विषय आहे. Dr Abhaykumar Dandge — writer and analyst on Marathwada’s agriculture, rural economy and regional politics

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात