नवी दिल्ली
केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि पीव्ही नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर याची घोषणा केली.
यापूर्वी हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अडवाणी वगळता इतर चारही व्यक्तिमत्त्वांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे. पंतप्रधान मोदींनी एकापाठोपाठ तीन ट्विटमध्ये तीन सेलिब्रिटींबद्दल लिहिले आणि त्यांना पुरस्कार जाहीर केला.
डॉ. एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्यासंदर्भात पंतप्रधान म्हणाले…
पीएम मोदींनी लिहिले, ‘भारत सरकार डॉ. एमएस स्वामीनाथन यांना त्यांच्या कृषी आणि शेतकरी कल्याणातील उल्लेखनीय योगदानासाठी भारतरत्न देऊन सन्मानित करत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले.
काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्न देण्यासंदर्भात पंतप्रधान म्हणाले…
पीएम मोदींनी लिहिले, ‘माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्नाने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देताना आनंद होत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून नरसिंह राव यांनी देशाची सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद व विधानसभा सदस्य या नात्याने त्यांनी केलेल्या कामामुळे ते आजही स्मरणात आहेत.
आतापर्यंत 53 जणांचा सन्मान
सुमारे 68 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या सर्वोच्च सन्मानाने आतापर्यंत 53 जणांना सन्मानित करण्यात आलं आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राज गोपालाचारी, शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरामन आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954 मध्ये प्रथम भारतरत्न देण्यात आला होता.