@vivekbhavsar
मुंबई
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून ओबीसी, मराठा आणि महिलेला संधी दिली जाणार असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्राने दिली. यातील एक उमेदवार मराठवाड्यातील तर दुसरा पश्चिम महाराष्ट्रातील असेल, अशी माहिती मिळते आहे.
महाराष्ट्र कोट्यातून निवडून आलेले आणि केंद्रात परराष्ट्र राज्यमंत्री असलेले व्ही मुरलीधरण हे त्रिवेंद्रम पश्चिम मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याने त्यांना यावेळी महाराष्ट्र कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात येणार नाही.
भाजपकडून राज्यसभेसाठी अनेक नावांची चर्चा असली तरी नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार निवृत्त होणारे नारायण राणे यांचे वय आणि तब्येत हे मुद्दे लक्षात घेता राणे यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात येणार नाही, अशी माहिती हाती आली आहे.
राज्यात मराठा आणि ओबीसी संघर्ष पेटलेला असल्याने त्यावर मलमपट्टी करण्यासाठी ब्राह्मण समाजातील नेत्याला उमेदवारी द्यायची नाही, असाही निर्णय भाजपने घेतल्याचे समजते. त्यामुळे विजया रहाटकर यांचे नाव देखील आता मागे पडले आहे.
भाजपकडून अमरीश पटेल यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. अमरीश पटेल हे ज्या शिरपूर तालुक्यातून येतात, तो आदिवासी राखीव मतदारसंघ असल्याने त्यांना आमदारकी लढवणे शक्य नाही. त्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेवर लागू शकते, असा दावा केला जात आहे. मात्र पटेल हे गुजराती समाजाचे असल्याने त्यांना संधी मिळेल, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला प्राधान्य द्यायचं असल्यामुळे विदर्भातून ओबीसी तर पश्चिम महाराष्ट्रातून मराठा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही उमेदवार कोण असेल याबद्दल कोणाकडेही खात्रीशीर माहिती नाही.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १५ तारखेला जामनेर आणि छत्रपती संभाजीनगर येथील दौऱ्यावर आहेत. त्याआधी भाजप उमेदवारांची नावे जाहीर करेल, असा दावा केला जात आहे.
हे ही वाचा – Rajya Sabha : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, महाराष्ट्र मात्र प्रतीक्षेतच!