मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शालेय सहल उपक्रमाने यंदा विक्रमी कामगिरी करत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक असल्याची माहिती परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी दिली.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना सरनाईक म्हणाले की, शालेय सहल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि संस्मरणीय अनुभव असून सुरक्षित आणि माफक दरातील प्रवासासाठी एसटी ही विश्वासार्ह सेवा ठरत आहे.
राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या मागणीनुसार यंदा एसटी महामंडळाने २५,५५८ बस फेऱ्या उपलब्ध करून दिल्या. या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांनी धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांना सुरक्षित प्रवास केला.
शालेय सहलींसाठी एसटीमार्फत प्रवास केल्यास विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत मिळते. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठा लाभ झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावर्षी सहलींसाठी अद्ययावत आणि नवीन बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी काळातही शालेय सहलींसाठी एसटी बसेस उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. शाळा आणि महाविद्यालयांनी खाजगी बसेसऐवजी एसटी सेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही सरनाईक यांनी केले.

