X: @therajkaran
मुंबई : अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर, महायुतीत भाजपाला ३२ पेक्षा जास्त जागा मिळतील अशी चर्चा रंगली आहे. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यामुळं अस्वस्थ झाल्याचं दिसतंय. भाजपानं नखानं गळा कापू नये, अशी अपेक्षा रामदास कदमांनी व्यक्त केली. तर अजित पवार उद्या अमित शाहांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपातील अनेक दिग्गजांनाही यावेळी घरी बसवतील, याची चर्चा सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तिन्ही पक्षातील नेते अस्वस्थ झाल्याचं दिसतंय. छत्रपती संभाजीनगर, जळगाव दौऱ्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अमित शाहांमध्ये जागावाटपाची चर्चा झाली. लोकसभेसाठी ३७० आकडा भाजपाला लोकसभेत गाठायचा आहे, त्यामुळे लोकसभेत भाजपाच जास्त जागा लढवणार आहे.
महायुतीचं संभाव्य जागावाटप?
- भाजपा-32 ते 35
- शिंदेंची शिवसेना- 08 ते 10
- अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस- 04 ते 06 जागा
जेवढे खासदार तेवढ्या जागा, हा निकष अमान्य असल्याचं सांगत, निवडून येण्याची क्षमता आणि सर्वेनुसार जागावाटप करण्यात यावं, असं अमित शाहांनी सांगितल्याचं समजतं. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे. यानंतर दिल्लीत बुधवारी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक जे पी नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत झाली. मित्र पक्षातील अस्वस्थता लक्षात घेता, मित्रपक्षांचा सन्मान ठेवला जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे 13 खासदार आहेत, ती संख्याही मिळणार नाही, अशी चर्चा सुरू असल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर भाष्य करण्याचं टाळलं असलं तरी, अस्वस्थ झालेल्या रामदास कदमांनी भाजपानं नखानं गळा कापू नये अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर फडणवीसांनी रामदास कदमांना अशी टीका करण्याची सवय असल्याचं सांगत, भाजपाकडे 115 आमदारांचं बळ असतानाही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याची आठवण करुन दिली आहे.
तर दुसरीकडे अजित पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्यांशी चर्चा व्हायची असल्याचं सांगितलं. शुक्रवारी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीत अमित शाहांना भेटण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर छगन भुजबळांनी शिंदेंच्या शिवसेनेइतक्याच जागा आपल्याला मिळावा, अशी आग्रही मागणी केली आहे. यावर कुणी काहीही मागणी केली तरी जागावाटप वास्तविकतेवरच होईल, असं फडणवीस म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकू असा दावा महायुतीकडून केला जात आहे. त्यामुळे शेवटी अमित शाहा जो निर्णय देतील तो मान्य करावाच लागेल, सध्या अशी परिस्थितीत दिसत आहे.