X: @therajkaran
मुंबई: लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election ) घोषणा झाली नसली तरीही राज्यात प्रचार – अपप्रचाराचे जोरदार वारे वाहू लागले आहेटी. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shiv Sena UBT) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चाही होऊ लागल्या आहेत. या चर्चेला आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पूर्णविराम दिला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसैनिकांमध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपच ही चर्चा घडवून आणत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाने (BJP) आयटी सेल, पोर्ट्ल आणि वेबसाइटच्या टोळ्या निर्माण केल्या आहेत. हे सडक्या मेंदूचे लोक आहेत. जेव्हा पराभव स्पष्ट दिसतो, तेव्हा अशाप्रकारचा गोंधळ निर्माण करायचा. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा त्यांचा उद्योग असतो. एक शिवसेना त्यांनी घेतली आहे. एक राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या दावणीला बांधली आहे. मग भाजपला मूळ शिवसेना कशासाठी हवी आहे,’ असा रोकडा सवाल राऊत यांनी केला आहे.
या भाजपनं सगळे चोर मंडळ बाजूला घेऊन त्यांच्या तोंडाला पट्ट्या चिटकवल्या आहेत. आता त्यांनी त्यांच्यासोबत सुखानं नांदावं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कोणत्याही चोर मंडळांमध्ये सहभागी होणार नाही, असं राऊत यांनी ठणकावलं आहे.
तसेच ‘मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अधिक चांगला ओळखतो. उद्धव ठाकरे हे अत्यंत स्वाभिमानी नेतृत्व आहे. ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली, ज्यांनी मराठी माणसासाठी निर्माण झालेल्या शिवसेनेचा घात केला, अशा व्यापारी लोकांबरोबर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याइतके आम्ही नतद्रष्ट आणि स्वाभिमानशून्य नाही, असंही राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शिवसेना भाजपमध्ये जाणार या चर्चेची सुरुवात राज्य सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलेल्या विधानामुळे झाली. आदित्य ठाकरे (Aadity Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची भेट घेतली आहे. त्यांना भाजपसोबत जायचं आहे, असं केसरकर म्हणाले होते. त्या चर्चेला आज राऊत यांनी पूर्णविराम दिला.