मुंबई
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी इतक्या वर्षांच्या कामानंतर काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे. निवडणुका तोंडावर असताना चव्हाणांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजीनाम्यानंतर पहिल्यांदा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मला पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही आणि कोणाची उणीदुणी काढायची नाही. मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. कोणाबद्दलही तक्रार केली नाही. मात्र प्रत्येक गोष्ट सांगता येत नाही’, असं म्हणत काँग्रेसमध्ये सर्व आलबेलं नसल्याचं सूचित केलं.
काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाणांच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चव्हाण पुढे म्हणाले, येत्या दोन दिवसात माझी भूमिका काय असेल याचं निवेदन देईल. जन्मापासून आजतागायत काँग्रेसचं काम केलं आहे. यापुढे अन्य पर्याय पाहायला हवं असं मला वाटलं म्हणून हा निर्णय घेतला. कालपर्यंत मी काँग्रेसच्या बैठकीत सहभागी होतो. पक्षाने मला मोठं केलं आणि पक्षासाठीही मी प्रामाणिकपणे काम केलं असंही ते म्हणाले. चव्हाणांसोबत १२ आमदार असल्याची चर्चा आहे. याचा त्यांनी नकार दिला. मी कोणत्याही आमदाराशी संपर्क केला नसल्याचं त्यांनी सांगितलं. तर येत्या १५ तारखेला ते भाजपत प्रवेश घेणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र हे वृत्तही त्यांनी खोडून काढलं. भाजपच्या कार्यप्रणालीविषयी माहिती नसून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, अशी जोड त्यांनी दिली.
अशोक चव्हाणांसोबत ९ आमदार भाजपमध्ये जाणार..
मराठवाड्याचे काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष डॉक्टर राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार याबाबत गेल्या एक वर्षांपासून राजकीय चर्चेला उधाण आले होते. त्यांचा आजचा राजीनामा हा भाजपची वाट धरण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मराठवाड्यातून काँग्रेस पक्षाचे आजी व माजी असे नऊ आमदार त्यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड- देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर तसेच नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह माजी आमदार अमर राजूरकर व माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर हे त्यांच्या समवेत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यामुळे नांदेडमध्येच आहेत. परंतु त्यांची भूमिका देखील अशोक चव्हाण यांच्यासोबतच राहील, असे राजकीय गोटातून सांगितले जात आहे. जालना येथील आमदार कैलास गोरंट्याल हे देखील अशोक चव्हाण यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करतील असे राजकीय संकेत आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाने काही महिन्यांपूर्वी दीडशे कोटी रुपयांची मदत केली. त्यावेळी मात्र पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाने काहीही मदत केली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी तसेच अशोक चव्हाण यांना झालेली भाजपची मदत ही मराठवाड्यातील राजकारणासाठी एक वेगळे व स्पष्ट संकेत देणारी घटना मानली गेली.
हे ही वाचा- आताची मोठी बातमी! अशोक चव्हाण यांच्यासोबत ‘हे’ आमदार करणार या पक्षात प्रवेश