पुणे
पुण्यामध्ये कुख्यात शरद मोहोळ यांचा खून झाल्यानंतर आता आरोपी म्हणून विठ्ठल शेलार याचे नाव पूढे आले आहे. तो भाजपच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. शरद मोहोळ याची पत्नी सध्या भाजपच्या महिला आघाडीची पदाधिकारी आहे, त्यामुळे पुण्यातील कुख्यात गुंडाना भाजपचाच आश्रय का? असा धक्कादायक सवाल आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करून मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
पुण्यातील कोथरूडचा मतदार हा मध्यमवर्गीय, सुशिक्षित. याच वर्गाने मोठ्या प्रमाणावर भाजपला समर्थन दिले. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या मतदारसंघाला गँगवॉरचा, गुंडांचा संसर्ग झालेला आहे. शरद मोहोळ यांच्या खुनानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस त्याला कुविख्यात गुंड म्हणतात तर निलेश राणे हिंदुत्व्वादी संबोधतात, नारायण राणे मात्र तो विद्वान होता का? असा प्रश्न मिडियालाच करतात. भाजपाचे पदाधिकारी त्याच्या कुटुंबीयाची भेट घेत पुढे हिंदुत्वाचे राजकारण करू, निवडून आणू अशी ग्वाही देतात. आता या खुनामागचा सूत्रधार म्हणून अटक झालेला गुंड विठ्ठल शेलार याने २०१७ मध्ये गिरीश बापट, माजी आमदार बाळा भेगडे आदींच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश केला होता व त्याला युवा मोर्चाचा अध्यक्ष पद दिले गेले होते, असंही ते यावेळी म्हणाले.
या सर्वामुळे पुणेकर सामान्य नागरिक धास्तावले आहेत. अस्वस्थ होतोय. या सर्वांचे भाजपा कनेक्शन कशासाठी आहे हे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट करावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.