एखाद्या देशाची प्रगती होऊ नये म्हणून अनेक शक्ती कार्यरत असतात. भारताची गेल्या काही वर्षांत सर्वच क्षेत्रात प्रगती होत आहे, त्यामुळे भारताला मागे ढकलण्यासाठी देशांतर्गत असंतोष आणि अराजकता पसरवण्याचे षडयंत्र आखले जात आहे. या षडयंत्रापासून आपण सावध राहण्याची गरज असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी सांगितले. ते आज, शनिवारी नागपूर येथे आयोजित विजयादशमी सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन (K Radhakrishnan) होते.
सरसंघचालक म्हणाले की, भारतातील अनेक घटक समाजात अस्थिरता आणि अराजक पसरवण्याचे प्रयत्न करत आहेत. जात, भाषा, प्रदेश इत्यादींवर आधारित भेदभाव निर्माण करून समाज तोडण्याच्या खेळी चालू आहेत. भारताच्या सीमेवरील पंजाब, जम्मू-काश्मीर, लद्दाख, केरळ, तामिळनाडू आणि पूर्वांचलमध्ये अस्वस्थता आहे. सध्या थेट युद्धाचे दिवस नसले तरी प्रचाराच्या विविध माध्यमांतून एखाद्या देशाची प्रगती रोखण्याचे प्रयत्न होतात. गेल्या काही वर्षांत भारताने सर्वच क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, त्यामुळे भारताला बदनाम करण्यासाठी काही विदेशी शक्तींच्या माध्यमातून देशात असंतोष पसरवला जात आहे.
बांगलादेशातील (Bangladesh) परिस्थितीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर झालेल्या हल्ल्यांचा (Attack on Hindus) गंभीर विचार करावा लागेल. हिंदू समाज एकत्र आल्यामुळे काही प्रमाणात बचाव झाला, पण कट्टरपंथीयांचे धोके अजूनही कायम आहेत. भारत सरकारने या प्रकरणात सातत्याने हस्तक्षेप करावा, अशी मागणी सरसंघचालकांनी केली.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT platform) आक्षेपार्ह कंटेंटवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. ओटीटीवर बिभत्स सामग्रीचे प्रदर्शन होत असल्याने कायदा करून त्यावर नियंत्रण आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरणाच्या समस्यांवर त्यांनी लक्ष वेधले आणि पारंपारिक शेती पद्धतींकडे परतण्याचे आवाहन केले. पाणी वाचवणे आणि सिंगल-युज प्लास्टिकचा वापर थांबवणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
पश्चिम बंगालमधील (West Bengal) अत्याचाराच्या घटनेवर भाष्य करताना त्यांनी या घटना संपूर्ण समाजाला कलंकित करणाऱ्या असल्याचे सांगितले. गुन्हेगारांना संरक्षण देण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. देशातील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल बोलताना डॉ. भागवत यांनी सांगितले की, देशभरात हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. गणेशोत्सवाच्या (Ganesh Festival) मिरवणुकीवर होणाऱ्या हल्ल्यांवर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, असे त्यांनी आवाहन केले.
आत्मरक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे, असे सांगत त्यांनी हिंदू समाजाने संघटित होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसेविका समितीच्या संचालिका शांताक्का, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.