Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असताना बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्तं कोरड्या घोषणा करण्यात आल्या. आता मंत्री नुकसानीचा दौरा करत आहेत, हा केवळ देखावा आहे. मंत्र्यांनी दौरे करावेत पण आधी शेतकऱ्याच्या हातात भरीव मदत द्या, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
टिळक भवन येथे गुरूवारी प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामानंतर (Kharif season) आता रब्बी हंगामही (Rabbi season) वाया गेला आहे. पण सरकार मात्र पोकळ घोषणा करत आहे. या आधी जाहीर केलेली मदतही शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहचलेली नाही. भाजपा सरकारने फक्तं सरकारच्या तिजोरीतून विमा कंपन्यांचे खिसे भरले आणि आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (compensation to farmers) देण्याची वेळ आली तर पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. पण काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, टोकाचे पाऊल उचलू नये. शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत काँग्रेस सरकारकडे पाठपुरावा करत राहिल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
मराठा-ओबीसी वाद सरकारचा ठरलेला कार्यक्रम
राज्यात मागील काही महिन्यांपासून आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र भाजपानेच आरक्षण प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाजात जाणीवपूर्वक भांडणे लावली आहेत. आरक्षण प्रश्नावरून मंत्रीमंडळातील मंत्र्यांची भांडणे हा सुद्धा सरकारचा ठरवून सुरु असलेला कार्यक्रम आहे. ही सर्व नौटकी सुरु असून राज्यातील सर्व जातींना आरक्षण मिळाले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे, त्यासाठी जातनिहाय जनगणना (caste census) केली पाहिजे पण भाजपा सरकार ही जनगणना करत नाही, असा थेट आरोप पटोले यांनी केला.
शिक्षकच नाहीत तर ‘आदर्श शाळा’ कसली
राज्यात सव्वा लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. पण सरकार त्या जागांची भरती करत नाही. भाजपा सरकार जिल्हा परिषदांच्या शाळा (ZP Schools) बंद करत आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नावाने आदर्श शाळा उपक्रमाची घोषणा करत आहे, हा सर्व हास्यास्पद प्रकार असून शाळेत शिक्षकच नाहीत तर आदर्श शाळा कसली? अशी विचारणाही पटोले यांनी केली.
पाच राज्यात काँग्रेसच विजयी होणार
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तिसगड, तेलंगाना व मिझोराम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका (assembly elections) पार पडल्या असून काँग्रेस पक्षाला या पाचही राज्यात जनतेचे मोठे समर्थन लाभले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी या राज्यात झंझावाती प्रचार केला. पाचही राज्यातील वातावरण काँग्रेस पक्षासाठी अनुकुल असल्याने काँग्रेसच या पाचही राज्यात बहुतमाने निवडून येईल, असा दावाही पटोले यांनी केला.