सीएचओ भरती, बंद उपजिल्हा रुग्णालये सुरू करण्यास प्राधान्य; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य सरकारने मोठी भरती मोहीम हाती घेतली आहे. ‘डॉक्टर्स डे’च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधानसभेत १,४०० डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच ५ हजार रिक्त पदांची भरती युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विधानसभेत माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून या आठवड्यापासून भरती प्रक्रियेला वेग दिला जाईल.
सीएचओ भरती आणि ग्रामीण आरोग्य सेवेला चालना
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १,९०० कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) पदेही तातडीने भरली जाणार आहेत. तसेच मनुष्यबळाअभावी कार्यरत नसलेली उपजिल्हा रुग्णालये पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले. यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आरोग्य पायाभूत सुविधांनाही प्राधान्य
राज्यात ५० ते ९० टक्के पूर्ण झालेल्या रुग्णालयांच्या बांधकामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या निधीविषयी स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार असल्याची माहितीही मंत्री आबिटकर यांनी दिली. कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गैरव्यवहार करणाऱ्या एजन्सींवर कारवाई
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि लाभांमध्ये अनियमितता करणाऱ्या एजन्सींवरही सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन ते तीन एजन्सींना ब्लॅकलिस्ट करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मंत्री आबिटकर यांनी सभागृहात दिली.
सदस्यांचे उपप्रश्न
या चर्चेदरम्यान आमदार विजय वडेट्टीवार, देवराव भोंगळे, डॉ. ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, अजय चौधरी आणि सुलभा खोडके यांनी विविध उपप्रश्न उपस्थित केले. उत्तर देताना मंत्री आबिटकर यांनी आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलणार असल्याचे स्पष्ट केले.

