११ ऑगस्टपर्यंत पर्याय ‘लॉक’ करणे बंधनकारक; १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय, १०,३२८ पदे मुलाखतीद्वारे भरली जाणार
मुंबई : राज्यातील डी.एड.-बी.एड. पात्र उमेदवारांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देत शिक्षक भरती प्रक्रियेला अधिकृत सुरुवात केली आहे. शालेय शिक्षण विभागाने ‘पवित्र’ (Pavitra) पोर्टलद्वारे एकूण ३०,२०९ शिक्षक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली असून, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शाळा, आदिवासी विकास विभाग आणि शासकीय विद्यानिकेतनांतील रिक्त पदे गुणवत्ताधारित आणि पारदर्शक पद्धतीने भरली जाणार आहेत.
शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएआयटी-२०२५ परीक्षेला २,११,३०८ उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी १,७०,१०८ उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली असून, या पात्र उमेदवारांना ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘पवित्र’ पोर्टलवर पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो ‘लॉक’ करणे बंधनकारक राहणार आहे.
भरती प्रक्रियेत जिल्हा परिषदांच्या १३,३५१, महानगरपालिकांच्या १,९५४, नगरपालिका-नगरपरिषदांच्या २८०, खाजगी संस्थांच्या १२,१४८, आदिवासी विकास विभागाच्या २,४२१ आणि शासकीय विद्यानिकेतनांच्या ५६ अशा एकूण ३०,२०९ पदांचा समावेश आहे.
यापैकी १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय, तर १०,३२८ पदे मुलाखतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.
इयत्तानिहाय पदांचे वर्गीकरण पाहता, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी १४,३२०, सहावी ते आठवीसाठी १०,०१२, नववी-दहावीसाठी ५,५१३ आणि अकरावी-बारावीसाठी ३६४ पदे उपलब्ध असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.
शिक्षक भरतीला गती; आता वेळेत नियुक्तीचे आव्हान
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरतीतील विलंब, न्यायालयीन वाद आणि मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांचा प्रश्न सातत्याने चर्चेत होता. अशा परिस्थितीत एकाच टप्प्यात ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती सुरू होणे हा शिक्षण विभागासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मात्र, भरती प्रक्रिया जाहीर करणे हा केवळ पहिला टप्पा आहे. गुणवत्तायादी वेळेत प्रसिद्ध करणे, पसंतीक्रमानुसार पारदर्शक नियुक्त्या करणे, न्यायालयीन व प्रशासकीय अडथळे टाळणे आणि नियुक्ती आदेश विनाविलंब देणे ही सरकारसमोरील खरी कसोटी असणार आहे.
राज्यातील लाखो डी.एड.-बी.एड. पात्र उमेदवारांचे भवितव्य या भरती प्रक्रियेशी जोडलेले असल्याने, संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकता आणि वेळापत्रकाकडे उमेदवारांसह शिक्षण क्षेत्र आणि विरोधी पक्षांचेही बारकाईने लक्ष लागले आहे.

