X : @vivekbhavsar
मुंबई: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागेसाठी २७ फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे. सहा पैकी पाच जागा महायुती जिंकेल तर एक जागा महाविकास आघाडी जिंकेल, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केले आहे.
विधानसभेचे सदस्य राज्यसभेसाठी मतदान करतात. सध्या विधानसभेचे २८६ सदस्य आहेत. त्यामुळे राज्यसभेचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी ४२ चा कोटा आवश्यक आहे. महायुतीतील पक्षीय संख्याबळ बघता भाजपचे तीन तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक उमेदवार सहज निवडून येईल. कॉँग्रेसचाही एक उमेदवार निवडून येईल. सातवा उमेदवार उभा केल्यास घोडेबाजार होण्याची शक्यत असल्याने सहाही जागा बिनविरोध निवडून याव्यात यासाठी प्रयत्न सरू झाले आहेत.
भाजपकडून निवृत्त होणारे सदस्य आणि सध्या केंद्रात केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांना महाराष्ट्र कोट्यातून पुन्हा निवडून दिले जाईल. म्हणजेच मुरलीधरन यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल. याशिवाय विजया रहाटकर यानंही भाजपची उमेदवारी मिळेल अशी शक्यता भाजप सूत्रांनी व्यक्त केली. रहाटकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि पक्षाच्या महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. सध्या त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असून राजस्थानच्या प्रभारी आहेत. छत्रपती संभाजी नगरचे महापौरपद भूषवलेल्या विजया रहाटकर यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वरदहस्त असल्याचे म्हटले जाते. भाजपचा तिसरा उमेदवार हा कोणाच्या ध्यानीमनी नसलेला असेल, असा दावा भाजप सूत्रांनी व्यक्त केला.
अजित पवार याच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अजित दादा यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासह माजी खासदार आनंद परांजपे, माजी विधान परिषद सदस्य आमरसिह पंडित आणि अविनाश आदीक इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इदरीस नायकवाडी यांच्याही नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी एकत्र असताना शरद पवार यांनी मजीद मेनन, फौजिया खान या अल्पसंख्यांक नेत्यांना राज्य सभेवर पाठवले होते. तोच कित्ता अजित पावत गिरवतील याची शक्यता नाही, असा दावा याच पक्षाच्या एका नेत्याने व्यक्त केली. शरद पवार यांनी गतकाळत आनंद परांजपे आणि अविनाश आदीक यांनाही राज्यसभेवर पाठविण्याचा शब्द दिला होता, असे म्हटले जाते. यापैकी आदीक यांना मतदारसंघच नसल्याने त्यांचा दावा प्रबळ ठरत असला तरी आनंद परांजपे हेदेखील शिवसेनेची खसदरकी सोडून राष्ट्रवादित आल्यापासून योग्य संधीची केवळ वाट बघत आहेत. विविध आंदोलन करून २५ हून अधिक पोलिस केस अंगावर घेतलेल्या आनंद परांजपे यांचा पक्षाची ताकद नसेलल्या आणि पराभूत होणाऱ्या मतदारसंघात ऐनवेळी उमेदवारी देवून बळीचा बकरा बनवला गेला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दुसरिकडे कुठल्याही मतदारसंघात लोकसंग्रह नसलेले, राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय नसलेले पार्थ अजित पवार यांना थेट २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उतरवून अजित पवार यांनी पार्थ यांची मर्यादाच उघड केली. थेट मावळ मध्ये निवडणूक लढवणारे पार्थ पवार शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्यासमोर टिकाव धरू शकले नव्हते. गेल्या साडेचार पाच वर्षात राजकारण कुठेही सक्रिय नसलेले पार्थ पवार यांची नजर आता राज्य सभा निवडणुकीकडे लागली असून आपल्यालाच तिकीट मिळणार असा दावा ते करत आहेत.अर्थात उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे एकत्र बसून घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.