X : @NalavadeAnant
मुंबई : राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे विरोधक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मंगळवारी दुसऱ्या दिवशीही आक्रमक झाले. महाविकास आघाडीने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ ‘तरुणांना दिला नाही रोजगार, त्यांच्यासाठी मांडलाय ड्रग्सचा बाजार’ ‘शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी’ अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी विरोधकांनी आज का राज गुंडाराज,गुंडांना पोसणाऱ्या,राजकीय आश्रय देणाऱ्या,वर्षावर गुंडांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशाही घोषणा दिल्या.
विधान सभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर सरकारला घेरत विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात, विधानपरिषद गटनेते सतेज बंटी पाटील, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा आ. वर्षा गायकवाड,भाई जगताप, अभिजित वंजारी,राजेश राठोड, माधवराव पाटील जवळगावकर,जयश्री जाधव,बळवंत वानखेडे,संजय जगताप शिवसेना ठाकरे गटाचे आ.सचिन अहिर, नरेंद्र दराडे,वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अनिल देशमुख,यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात घोषणा लिहिलेले फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.