मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha )मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा होती त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून (Bharatiya Janata Party) प्रचंड विरोध करण्यात आला . तसेच त्यांची उमेदवारी बदलावी अशी मागणी देखील केली जात होती . मात्र,तरी सुद्धा धैर्यशील माने यांनी या मतदारसंघात उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा दावा केला होता .आता या ठिकाणची परिस्थिती बदलल्याने धैर्यशील माने यांच्यावरील टांगती तलवार दूर झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यास नकार दिल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून (thackeray group) सत्यजित पाटील सरूडकर (Satyajit Patil )यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेट्टी यांचे स्वत:चे चिन्ह असल्याने ठाकरेंच्या मशाल चिन्हावर लढण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला . मात्र, त्यानंतर ते म्हणाले , मी शेतकऱ्यांची चळवळ कायम ठेवण्यासाठी मी स्पष्ट नकार दिला. राजकारण करायचं असेल तर कधीच राष्ट्रीय पक्षासोबत गेलो असतो. शिवसेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांचे वडील हे एक साखर कारखाना चालवतात.त्यामुळे ही निवडणूक शेतकरी विरुद्ध कारखानदार अशी होईल. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये आता तिरंगी लढत होणार असल्याने धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवरील टांगती तलवार आता टळली असल्याचं निश्चित झालं आहे . त्यामुळे या मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने , स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि ठाकरेंचे सत्यजित पाटील यांच्यात तिहेरी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे .
दरम्यान लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरीही महायुतीमध्ये विशेषत: भाजप आणि शिंदे गटात अनेक जागांवरुन रस्सीखेच सुरु आहे. मुंबई उत्तर-मध्य, मुंबई उत्तर-पश्चिम, ठाणे, नाशिक, पालघर, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि दक्षिण मुंबई या नऊ मतदारसंघांमधील महायुतीचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे यावर लवकर तोडगा निघणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे